आश्वी l झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पुर्व भागातील शिबलापूर , पानोडी गावामधील वाड्या वस्त्यांवर बिबट्याचा अनेका दिवसांपासून धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे . बिबट्याचा दिवसाढवळ्या वावर असल्याने शेतकऱ्यांसह लोक धास्तावून गेले आहेत. शिबलापूर येथील संगमनेर रस्त्यालगत रहात असणाऱ्या बबन कारभारी म्हस्के या शेतकऱ्यांच्या गोठ्यात असलेल्या तीन शेळ्यांचा बिबट्याने मंगळवारी पहाटे 4 च्या सुमारास फडशा पाडला तर शेजारीचं असणाऱ्या मक्याच्या पिकात एक शेळी घेवून पलायन केल्याने या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले तर बिबट्याची दहशत निर्माण झाली .

गेल्या दोन दिवसापासून शिबलापूर , पानोडी या गावातील वाड्या वस्त्या वरील शेळी, कुत्रे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत. वनविभागाचे अधिकारी येऊन पंचनामा करतात. शासनाची नुकसान भरपाई खात्यात जमा होईल असे सांगून वेळ मारून नेतात. मात्र या भागातील शेतकरी, महिला, शाळेत जाणारी लहान बालके यांनी बिबट्याची दहशत घेतली आहे.

वनविभागाचे अधिकारी पिंजरा लावून संबंधित बिबट्याला कधी जेरबंद करणार असा नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. चारचं दिवसापुर्वी शिबलापूर – पानोडी शिवावरील नागरे , रक्टे वस्तीवर बिबट्यानी लक्ष्य करत शेळ्या . बोकड्या फस्त केल्या होत्या तर पंधरा दिवसा पुर्वी पानोडीच्या चव्हाण – गफले वस्तीवर तर दिवसाढवळ्या बिबट्यांने शेळ्यावर हल्ला चढविला होता .


वनाधिकारी सुभाष सांगळे , सुहास उपासनी यांच्या मार्गदर्शनाखाली वन रक्षक हरिचंद्र जोजर यांनी सदर घटनेचा पंचनामा करत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांला तातडीने मदत केली जाईल व बिबट्याच्या बंदोबस्ताकरिता त्वरीत पिंजरा लावण्यात येईल असे सांगण्यात आले .

