रोजगार व स्वयंरोजगारासाठी महिलांना संधी निर्माण
संगमनेर | झुंजार न्यूज
राज्याचे नेते तथा तालुक्याचे कुटुंबप्रमुख आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगत असलेल्या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक कुटुंबातील महिला आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम व्हावी याकरता त्यांना गृह उद्योग रोजगार व स्वयंरोजगाराच्या मार्गदर्शन व मदतीसाठी डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या इंदिरा महोत्सवात तालुक्यातील 35 हजार महिलांनी सहभाग नोंदवला असून यामुळे अनेक महिलांना गृह उद्योगासाठी मोठी प्रेरणा मिळाली असून महिलांच्या या अभूतपूर्व उपस्थितीने इंदिरा महोत्सव संस्मरणीय ठरला आहे.

कारखाना कार्यस्थळावर अत्यंत दिमाखदार पद्धतीने या इंदिरा महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी प्रशस्त जर्मन हँगर पद्धतीचा मंडप ,सुसज्ज बैठक व्यवस्था ,भोजन कक्ष, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या सहभागातील प्रात्यक्षिक दाखवणारे प्रदर्शन, मनोरंजनाचे खेळ, भक्ती संगीत, शालेय विद्यार्थिनीचे सांस्कृतिक कार्यक्रम, उखाणे स्पर्धा आणि पैठणीचा खेळ यामुळे हा महोत्सव लक्षात राहणारा ठरणार आहे.

सह्याद्री ऍग्रो, टू ब्रदर्स, कृषी विद्यापीठ, बारामती ॲग्रो, लीज्जत पापड ,कापसे पैठणी, शासकीय कृषी व ऊर्जा विभाग यांसह अनेक कंपन्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या. याचबरोबर सत्यजित हंगे, पौर्णिमा शिरसकर, केंद्रीय ऊर्जा विभागाचे भट्टे, मनीषा कटके, बाळासाहेब कापसे यांसह अनेक उद्योजकांनी उपस्थित राहून महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करणे बाबत मार्गदर्शन केले.

तसेच यावेळी सर्व महिलांची नोंदणी करून त्यांना आवडीच्या व्यवसायामध्ये रोजगाराच्या संधींची माहिती देत. त्यासाठी करावयाची कागदपत्रे ,बँकिंगचा पाठपुरावा,मार्केटिंगची संधी, आणि त्यांनी तयार केलेल्या उत्पादित मालाला थेट कंपन्याशी समन्वय करून देण्यात आला. यामुळे महिलांमध्ये उद्योजक होण्यासाठी मोठी मानसिकता निर्माण झाली. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात पहिल्या दिवशी 15000 तर दुसऱ्या दिवशी 20000 महिला भगिनींनी सहभाग घेतला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येक सेमिनार मध्ये महिलांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली.

याचबरोबर उद्योजकांशी झालेला संवाद हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. अनेक महिलांच्या मनात असलेल्या प्रश्न -उपप्रश्नांना उद्योजक बँकिंग व्यावसायिक तज्ञ मार्गदर्शक विक्री व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञ मंडळींनी उत्तरे दिली. तर संगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी महिलांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी लिज्जत पापड व कापसे पैठणी हे केंद्र सुरू करणार असून कच्चामाल देऊन महिलांकडून उत्पादित पक्का माल या कंपन्या घेणार आहेत.

याचबरोबर आलेल्या सर्व महिलांना एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने एक आरोग्य कार्ड देण्यात आले असून त्यामधून 10 विविध प्रकारच्या तपासण्या एसएमबीटी हॉस्पिटल या ठिकाणी केल्या जाणार आहेत.

स्वतः डॉ.जयश्रीताई थोरात यांनी प्रत्येक महिलेची आपुलकीने केलेली विचारपूस आणि त्यांचे अमृत उद्योग समूहाने केलेला सन्मान व स्वागत भारावून टाकणारे होते. दोन दिवस झालेल्या या महिला महोत्सवात काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, खासदार प्रणिती शिंदे, खासदार डॉ.शोभाताई बच्छाव,खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, सौ प्रभावतीताई घोगरे,सौ.दुर्गाताई तांबे,रणजीतसिंह देशमुख, यांनी मार्गदर्शन केले.

100 भाग्यवंत महिलांना मिळाल्या पैठणी
कापसे पैठणी च्या वतीने इंदिरा महोत्सवात सहभागी झालेल्या भाग्यवंत महिलांना 100 पैठणी देण्यात आला. यावेळी सर्वांना कुपन देण्यात आले. लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या टाकून या 100 महीलाची निवड झाली. पैठणी जिंकल्यानंतर सर्व महिलांनी नृत्य आणि धमाल करून आपला आनंद साजरा केला ठरला.

महिलांच्या उस्फूर्त सहभागाने रोजगार मार्गदर्शनाचा उद्देश सफल झाला – डॉ.जयश्रीताई थोरात
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा सुमारे सात लाख दुधाचे दररोज उत्पादन करत असून यामध्ये महिलांचे मोठे योगदान आहे कुटुंबाच्या आर्थिक प्रगती बरोबर त्या घरातील महिला अधिक सक्षम व समृद्ध होताना त्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीला हातभार लागावा याकरता रोजगार व स्वयंरोजगार यासाठी आयोजित केलेल्या या इंदिरा महोत्सवात तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले असून यातून सर्व महिलांना उद्योग व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळाली असल्याने महोत्सवाचा उद्देश सफल झाला असल्याचे आयोजक कॅन्सरतज्ञ डॉ. जयाताई थोरात यांनी म्हटले
