नाशिक। झुंजार न्यूज
नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात साकारण्यात आलेल्या स्मारकात फुले दांपत्याच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पांचे आज राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व पालकमंत्री मा. दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण पार पडले. हा सोहळा अनुभवताना खऱ्या अर्थाने मन आनंदाने भरून आलं.

याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधत भावना व्यक्त केल्या. क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीमाई यांना जिवंतपणी अनेक समाजाकडून अडथळे निर्माण करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर देखील त्यांच्या विचारांवर हल्ला करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांचे अभेद्य विचार कायम राहिले आहे. त्याचप्रमाणे मुंबई नाक्यावर उभारलेले हे पुतळे अतिशय मजबूत असून ते अभेद्य राहतील, असा विश्वास व्यक्त करत महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचे विचार समाजात रुजविण्यासाठी अविरत काम करू असा निर्धार व्यक्त केला.

स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या नाशिक शहरात गणेशवाडीत १९३१ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते महात्मा फुलेंचा अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. त्याआधी व त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात क्रांतिसूर्य महात्मा फुलेंच्या उभारण्यात आलेल्या प्रमुख पुतळ्यांचा मागोवा घेतला. आज आपल्या प्रयत्नांतून हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. मुंबई नाका येथील वाहतूक बेटामुळे वाहतुकीस अडचणी निर्माण होत असल्याने सुमारे ३३६६ मीटर आकाराचे हे बेट कमी करण्यात येऊन २७१० मीटरवर आणण्यात आले. तसेच मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक द्वारकाकडे जाण्यासाठी सरळ मार्गिका तयार करण्यात आली, या ठिकाणी सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण न होता वाहतूक सुरळीत होऊन येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. त्यांच्या कंपनीने धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापड गिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामं केली. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते. जोतीरावांचे कितीतरी आप्तमित्र ब्राह्मण होते. तात्यासाहेब भिडे, आप्पासाहेब चिपळूणकर, भवाळकर, सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम यशवंत परांजपे, मोरोपंत विठ्ठल वाळवेकर इ. मित्र शेवटपर्यंत जोतीरावांना सामाजिक सुधारणेच्या चळवळीतही सहकारी म्हणून चिकटून राहिले असल्याचे यावेळी सांगितले.

सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला. १८६३ साली स्थापन करण्यात आलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृहाची कल्पना त्यांचीच होती. तिथे आलेल्या ३५ ब्राह्मण विधवांची बाळंतपणं त्यांनी पोटच्या मुलींची करावीत, अशा मायेनं केली. त्यातलाच एक मुलगा दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनवले. सन १८७२ ते १८७६ या काळात पडलेल्या भीषण दुष्काळात गोरगरिबांची सुमारे एक हजार मुलं त्यांनी सांभाळली. प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी स्वतःच्या पाठीवर रुग्णांना घेऊन जात उपचार दिले. अशा प्रकारे माहिती देत फुले दाम्पत्याच्या कार्याला शब्दसुमनांतून आदरांजली वाहिली.

यावेळी सोहळ्यास माजी मंत्री महादेव जानकर, खा. राजाभाऊ वाजे,आ. प्रा. देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, आ. राहुल ढीकले, आ. सरोज अहिरे, आ. दिलीप बनकर, आ. नितीन पवार, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष समीर भुजबळ, माजी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार पंकज भुजबळ,वसंत गिते, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रदेश सरचिटणीस समाधान जेजुरकर, लक्ष्मण सावजी, सुधाकर बडगुजर, प्रकाश लोंढे, विलास शिंदे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने, डॉ. शेफाली भुजबळ, भाऊलाल तांबडे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्षा योगिता आहेर, अंबादास खैरे, उदय आहेर, डी. के. जगताप, मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, आर्किटेक्ट शाम लोंढे, कंत्राटदार पंकज काळे यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, मान्यवर, विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

