राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. आता निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशात महायुतीमधून भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वाने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजूरी दिली असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही या निर्णयाला होकार दिला असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली आहे. याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणार आहेत.
तर शिवसेनेला सुमारे १२ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता असून, यामध्ये काही महत्त्वाच्या खात्यांचाही समावेश आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीलाही जवळपास १० मंत्रिपदे मिळणार आहेत. १३२ आमदार असलेल्या भाजपाच्या वाट्याला २१ मंत्रीपदे येण्याची शक्यता आहे. गृह, अर्थ, नागरी विकास आणि महसूल ही प्रमुख चार खाती भाजपा आपल्याकडे ठेवण्यास उत्सुक आहे. भाजपा गृह आणि अर्थ खात्यासाठी आग्रह धरू शकते,” असे भाजपच्या अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे.
मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत काही मोजक्या व ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करून नंतर मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे.
भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील,सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे, बबनराव लोणीकर, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, नितेश राणे, किसन कथोरे, राहुल कुल या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकतर मागील मंत्रिमंडळातीलच चेहरे दिसण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतूनएकनाथ शिंदे यांच्यासह गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसकर, संजय राठोड, शंभूराज देसाई यांच्यासह भरत गोगावले आणि संजय शिरसाट शपथ घेऊ शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेसकडूनअजित पवार यांच्यासह दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ , संग्राम जगताप , आशुतोष काळे यांची नावे चर्चेत आहेत. तर रिपब्लिकन पक्ष हा महायुतील महत्वाचा घटक पक्ष असल्याने रिपब्लिकन पक्षाच्या एका सदस्याचा शपथविधी होवू शकतो .