प्रस्तावित आश्वी अप्पर तहसील कार्यालयाचा चुकीच्या प्रस्तावाबाबत तीव्र नाराजी
तातडीने हा प्रस्ताव रद्द करण्याच्या सूचना देण्याची मागणी
संगमनेर । झुंजार न्यूज
काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आश्वी येथे प्रस्तावित असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव हा अत्यंत चुकीचा असून त्यामुळे संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेसह भौगोलिक रचनेला धक्का लागणार असून जनतेची मोठी गैरसोय होणार असल्याने हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा याबाबत मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री बावनकुळे यांना पत्र दिले आहेत
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय प्रस्तावित असून यामध्ये संगमनेर शहरालगतच्या संगमनेर खुर्द समनापुर या महसूल मंडळांचा देखील समावेश केला आहे. यामुळे शहरालगची गावे ही दूरवरच्या आश्वीला जोडली जाणार आहे. यातून नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याने संगमनेर तालुक्यामध्ये याबाबत मोठी संतापाची लाट उसळली आहे. याबाबत विविध गावांमधील नागरिकांच्या शिष्टमंडळाने माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन या कार्यालयाचा प्रस्ताव रद्द करावा यासाठी मागणी केली यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुक्याची मोडतोड होऊ देणार नाही असा इशारा प्रशासनाला दिला आहे .

याचसोबत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना या चुकीच्या प्रस्तावा बाबत पत्र लिहिले आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याबाबत तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी संगमनेर यांनी शासनाकडे पाठवलेल्या प्रस्ताव हा अत्यंत चुकीचा आहे. तो वस्तुस्थितीला धरून नाही. या प्रस्तावामुळे जनतेची सोय होण्यापेक्षा गैरसोय अधिक होणार आहे. असे दिसते संगमनेर शहरालगाच्या गावांना देखील या प्रस्तावानुसार आश्वी बुद्रुक या प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालया जोडले आहे. भौगोलिक परिस्थिती, महसुली मंडळाची सोय अशा कोणत्याच बाबींचा या प्रस्ताव तयार करताना विचार केलेला नाही.

महत्त्वाचे म्हणजे यातील अनेक गावांना प्रास्तावित आश्वी येथील कार्यालयात जाण्यासाठी संगमनेर वरूनच जावे लागते आहे. ही बाब अत्यंत गंभीर व प्रशासनाच्या बेजबाबदारपणाची आहे.

या प्रस्तावामुळे तालुक्याच्या एकता आणि अखंडतेला धक्का लागला आहे. तरी मुख्यमंत्री महोदय व महसूल मंत्री महोदय यांनी आपल्या स्तरावरून या गंभीर बाबीची दखल घेऊन महसूल विभागाने काढलेला हा चुकीचा प्रस्ताव रद्द करून तातडीने फेरविचार करण्यासंबंधी कळवावे.

महसूल प्रशासनातील ताण कमी करत असताना जनतेची गैरसोय होणार नाही. याची दक्षता घ्यावी. तसेच संगमनेर तालुक्याची एकता, अखंडता आणि सांस्कृतिक परंपरेला तसेच भौगोलिक रचनेला धक्का लागणार नाही. याबाबत ही तातडीने नवा प्रस्ताव करण्याच्या सूचना द्याव्या अशी मागणी मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे .

या पत्रानंतर मुख्यमंत्री कार्यालय व महसूलमंत्री कार्यालय यांच्याकडून याबाबत सकारात्मक विचार होईल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना सांगण्यात आले आहे.

