विश्रांती शब्द माहीत नसलेले लोक नेतृत्व


संगमनेर l झुंजार न्यूज

 

 

साहेब, आमचं काम बघा , या कार्यक्रमाला यायलाच पाहिजे ,  फोन लावा, मदत पाहिजे… अशा असंख्य हाका, अपेक्षा आणि विश्वास आजही संगमनेरच्या माजी आमदार व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याभोवती फिरताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास आणि आपलेपणा तसाच कायम आहे. नेत्याचा पराभव झाला, पण माणूस हरलेला नाही हेच चित्र आज संगमनेर तालुक्यात ठिकठिकाणी दिसून येते.

 

 

राजकीय पराभवानंतर अनेक नेते काही काळ विश्रांती घेतात, काही ठराविक मंडळींमध्येच दिसतात, पण बाळासाहेब थोरात यांनी मात्र उलट मार्ग निवडला. निवडणुकीत मतांनी मागे पडले, पण मनाने ते जनतेच्या अजून जवळ गेले. लोकांच्या अडचणी ऐकण्यासाठी त्यांचे यशोधन कार्यालय नेहमीप्रमाणे खुले आहे. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो लोक आजही या कार्यालयात आपल्या अडचणी घेऊन येतात आणि त्यांना तितक्याच आपुलकीने उत्तर दिलं जातं.

 


गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सुटत आले आहेत. जमीन मोजणी, वीज जोडणी, सरकारी योजना, आरोग्यविषयक मदत, शैक्षणिक मार्गदर्शन… कुठलाही विषय असो, साहेब बघतील” हा विश्वास आजही जनतेच्या मनात आहे. म्हणूनच कोणतेही काम असो, थोरात यांना फोन किंवा आमंत्रण देणे हे अनेकांसाठी आवश्यक बाब ठरते.

 

 

अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्यांमुळे अनेक शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांचीही पडझड झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्वरित प्रशासनाशी संपर्क साधून नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे. थोरात यांनी कृषी मंत्री पदाची जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे सांभाळली असून त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी अनेक उपयुक्त योजना राबवण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात त्यांच्या नशिबावर सोडणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. “शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावेत,” अशी मागणी करत त्यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.

 

 

थोरात यांच्या नेतृत्वाने साखर कारखाना, दूध संघ, बाजार समिती, शेतकी संघ, अमृतवाहिनी बँक यांसारख्या अनेक संस्था बळकट केल्या आहेत. त्या माध्यमातून आजही ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, व्यापारी वर्ग थेटपणे जोडलेले आहेत. त्यामुळे त्यांची मदत मागण्यासाठी किंवा मार्गदर्शन घेण्यासाठी लोक सतत त्यांच्या संपर्कात राहतात. लोकांना वाटतं की थोरात यांचं काम केवळ विकासाच्या योजना आणणं नव्हे, तर त्या योजनांची अंमलबजावणी होईपर्यंत मागे लागणं, संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करणं आणि गरजूंना योग्य न्याय मिळवून देणं ही त्यांची खरी ओळख आहे.

 

 

 

Oplus_131072

त्यांच्यात एक आदर्श कार्यसंस्कृती आहे. जेव्हा जनतेचा आवाज कुठेतरी दडपला जातो, तेव्हा थोरात तो आवाज बनून पुढे उभे राहतात. त्यामुळेच ते केवळ राजकारणी नाही, तर आपला माणूस म्हणून ओळखले जातात. आजची परिस्थिती सांगते की, संगमनेरच्या राजकारणात सत्ता बदलू शकते, पण थोरात यांच्यावरील विश्वासाची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पराभवाच्या नंतरचा त्यांचा संयम, सातत्य, आणि कार्यतत्परता हीच त्यांच्या खऱ्या नेतृत्वाची ओळख आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed