जल सेवा अध्ययन’मधील उत्कृष्ट कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल….



संगमनेर । झुंझार न्यूज

भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ११ मार्च २०२६ रोजी आयोजित ‘जल महोत्सवात’ अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सहभाग नोंदवून महाविद्यालयाचा नावलौकिक देशपातळीवर वाढवला आहे.

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत राबवण्यात आलेल्या ‘जल सेवा अध्ययन’ या राष्ट्रीय उपक्रमात अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या ३ प्राध्यापक आणि १५ विद्यार्थ्यांनी (एकूण ३ संघ) उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या उपक्रमांतर्गत १ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत गुजरात राज्यातील वलसाड, नवसारी आणि सुरत जिल्ह्यांमधील गावांना भेटी देऊन प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे आणि जल पायाभूत सुविधांचे सखोल तांत्रिक मूल्यमापन केले.

या पाहणीत विद्यार्थ्यांनी पाण्याचे स्रोत, पंपिंग यंत्रणा, पाणी साठवणूक टाक्या, जलवाहिनीचे जाळे आणि बांधकामाचा दर्जा तपासला. तसेच पाण्याची गुणवत्ता चाचणी करून घरोघरी जाऊन नळजोडणी, पाण्याचा दाब आणि नागरिकांचे समाधान यांचे सर्वेक्षण देखील करण्यात आले. हे सविस्तर तांत्रिक अहवाल मंत्रालयाला सादर करण्यात आले या अहवालाची आणि महाविद्यालयाच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत मंत्रालयाने महाविद्यालयाच्या प्रतिनिधींना नवी दिल्ली येथील ‘जल महोत्सवा’साठी विशेष निमंत्रित केले.

विज्ञान भवनात झालेल्या या भव्य सोहळ्यात महाविद्यालयाच्या वतीने प्रा. चेतन कडलग, प्रा. अभिषेक बोचरे यांनी महाविद्यालयाचे अभिमानाने प्रतिनिधित्व केले. भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते या महोत्सवात स्थानिक व तळागाळातील नेतृत्वाचा सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री माननीय श्री. सी. आर. पाटिल, तसेच राज्यमंत्री माननीय श्री. वी. सोमन्ना आणि माननीय श्री. राज भूषण चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांच्या मार्गदर्शनाखाली, महाविद्यालयाने निरंतर सामाजिक व तांत्रिक बांधिलकी जपली असून, गेल्या ९ वर्षांपासून अमृतवाहिनी महाविद्यालयाने ‘उन्नत भारत अभियान’ आणि ‘उन्नत महाराष्ट्र अभियान’ यांसारख्या महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. याशिवाय, आयआयटी मुंबई (IIT Mumbai – CTARA) सोबत संलग्न राहून महाविद्यालय समाजासाठी विविध तांत्रिक सेवा पुरवत आहे. या माध्यमातून परिसरातील अनेक गावांमध्ये ‘जल जीवन मिशन’ (JJM), ‘स्वच्छ भारत अभियान’ (SBM) आणि जल पुनरुज्जीवन योजना (Water Rejuvenation Schemes) यशस्वीपणे राबवण्यासाठी महाविद्यालयाकडून सातत्याने मोलाचे तांत्रिक मार्गदर्शन व मदत केली जात आहे.

“देशभरातून केवळ १८ पथकांची निवड या कार्यक्रमासाठी करण्यात आली होती, त्यामध्ये महाराष्ट्रातून निमंत्रित करण्यात आलेले ‘अमृतवाहिनी’ हे एकमेव महाविद्यालय ठरले आहे. विज्ञान भवनसारख्या प्रतिष्ठित राष्ट्रीय मंचावर राज्याचे आणि संस्थेचे प्रतिनिधित्व करणे, हे महाविद्यालयाच्या उच्च शैक्षणिक दर्जाचे आणि मामाजिक बांधिलकीचे प्रमाण आहे.”

यावेळी त्यांनी ही अद्वितीय संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (AICTE) आणि जल शक्ती मंत्रालयाचे मनःपूर्वक आभार मानले.  महाविद्यालयातील शिस्त, नियोजन, समृद्ध ग्रंथालय, अद्ययावत प्रयोगशाळा, निसर्गरम्य परिसर आणि उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेमुळे राज्यात महाविद्यालयाचा मोठा लौकिक आहे. याच लौकिकात आता राष्ट्रीय स्तरावरील या यशाने मानाचा तुरा खोवला आहे.                                              

या यशस्वी कार्यक्रमासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अनिल शिंदे, शैक्षणिक संचालक डॉ. जे. बी. गुरव, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, रजिस्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे व विभागप्रमुख डॉ. एस. बी. कांडेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.                                         

या यशाबद्दल राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, विश्वस्त डॉ. सुधीरजी तांबे आणि सौ. शरयूताई देशमुख यांनी प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, डॉ. एस. बी. कांडेकर व सहभागी प्राध्यापकांचे विशेष कौतुक केले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *