आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे येत्या रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान वीर एकलव्य, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दिवसभर विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.

या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर एकलव्य यांच्या स्मारकाचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. हे स्मारक येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ४ वाजता अकोले तालुक्यातील सुप्रसिद्ध आदिवासी नृत्य पथकाच्या सादरीकरणाने होईल. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत होणाऱ्या या नृत्यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत महामानवांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात येईल. या मिरवणुकीत डीजे (DJ) आणि फटाक्यांची मोठी आतिषबाजी करण्यात येणार असून संपूर्ण गाव सुशोभित केले जाणार आहे.

मिरवणुकीनंतर सायंकाळी ८ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत ‘अभिवादन सभा’ पार पडेल. या सभेत महामानवांच्या विचारांचा जागर केला जाईल. सभेच्या सांगतेनंतर रात्री ८:३० वाजता सर्व उपस्थित जनसमुदायासाठी ‘महाप्रसाद’ (गोडधोड स्नेहभोजन) ची व्यवस्था करण्यात आली आहे.

महोत्सवाचा मुख्य सोहळा रात्री ९ वाजता सुरू होईल. ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम प्रसिद्ध सिने गायक अविनाश कदम यांच्या बहारदार ‘भीम गीतांचा’ आणि प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम रात्री १२ वाजेपर्यंत चालणार आहे. या संगीतमय कार्यक्रमातून भीमरायांच्या कार्याला स्वरांजली अर्पण केली जाणार आहे.

संयुक्त जयंती समिती उंबरी बाळापूर व समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. उंबरी बाळापूरसह परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांनी, माता-भगिनींनी आणि तरुणांनी या ऐतिहासिक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

