महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले हिंदुकोड बील हे ऐतिहासिक बील होते. हिंदुकोड बिलामुळेच स्वतंत्र भारतातील महिलांना समान अधिकार प्राप्त झाले. महिलांच्या समान न्याय हक्कांचा पाया महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिला द्वारे रचला आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
झारखंड मधील रामगढ येथील राधा गोविंद युनिव्हर्सिटी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडरांचे आर्थिक आणि कामगार विषयक विचार या विषयांवर आयोजित सेमिनारमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी सभागृह विद्यार्थ्यांनी तुडुंब भरले होते. यावेळी विद्यापिठाचे संस्थापक श्री बैजनाथ शाह, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री रंग नाथ पांडे; राधा गोविंद विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.रश्मी सिंह, जबलपूर च्या महाकौशल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. आर.सी. मिश्रा, आदि मान्यंवर उपस्थित होते.
हिंदुकोड बिलामुळेच महिलांना कायदेशिर अधिकार प्राप्त झाले. मुलींना वडिलोपार्जीत संपत्तीचा समान अधिकार दमिळाला. महिलांना हिंदु धर्मातील रुढी परंपरा झुगारुन घटस्फोटातील महिलांच्या हक्काचा अधिकार मिळाला.शिक्षण, संपत्ती, नोकरी, वारसाहक्क, पुरुषांच्या बरोबरीने समान अधिकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मिळवुन दिले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मजुरमंत्री असतांना त्यांनी कामगारांचे कामाचे 12 तास ऐवजी 8 तास केले. गर्भवती महिलांना भरपगारी सुट्टी मिळवुन दिली आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या द प्राब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामुळे ते जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ ठरले आहेत. त्यांच्या प्रबंधावरच भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दामोदर व्हॅली निर्माण करुन तेथे 7 धरणे बांधली आहेत. धरण बांधुन विजनिर्मीती प्रकल्प सुरु करण्याची संकल्पना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीच आहे. नदीजोड प्रकल्प ही मूळ संकल्पना डॉ बाबासाहेब आंबेडकरांची आहे. भारत देश घडवण्यासाठी; भारताला सर्व क्षेत्रात परिपुर्ण करण्यासाठीचा पाया महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अपार ज्ञानामुळे रचला आहे. जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ, सामाजिक क्रांतीचे क्रांतीसुर्य म्हणून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला एक समृद्ध राष्ट्र म्हणून घडविण्यात भरीव योगदान दिले आहे असे प्रतिपादन ना. रामदास आठवले यांनी यावेळी केले.