Mumbai : Zunjhar news महाराष्ट्र सहकारी दूध महासंघ मर्यादित (महानंद)चे पुनरुज्जीवन करून फायद्यात आणण्यासाठी ही डेअरी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने सामावून घेण्यास सहमती दर्शविली आहे. याबाबत पुढील चर्चा सुरू असून ४५० कर्मचारी सामावून घेण्याची तयारी मंडळाने दर्शविल्याची माहिती दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
भाई गिरकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना विखे-पाटील यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित (महानंद) ही सरकारी संस्था गैरव्यवहारामुळे आणि अपुऱ्या दूध पुरवठ्यामुळे आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली आहे.
महानंदमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी मागील पावसाळी अधिवेशनात नेमलेल्या समितीकडून अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे.
मात्र तो अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. माजी संचालकांवर कारवाई करणार का, कर्मचाऱ्यांच्या सेवेचे काय, अशी लक्षवेधी विधान परिषदेत भाई गिरकर यांनी मांडली. महानंदच्या उपविधीप्रमाणे सदस्य संघांकडून त्याच्या संकलनाच्या पाच टक्के दूधपुरवठा केला जात नसल्याने महासंघाच्या दूध संकलनात घट झाली आहे. परिणामी, टेट्रा पॅक प्रकल्प सज्ज असूनही दुधाअभावी सैन्य दलाला दूधपुरवठा करण्याचा ठेका रद्द झाल्याची झाल्याची कबुली पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली.
दरम्यान विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना विखे-पाटील यांनी सांगितले, की आर्थिक गैरव्यवहाराबाबत समितीचा अहवाल आला असून त्याच्या अभ्यास सुरू आहे. त्यानंतर कारवाई करण्यात येईल.
सध्या महासंघाची आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनासाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या चर्चेत सचिन अहीर, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.
महानंदला अखेरची घरघर लागल्याची कबुली मंत्री विखे पाटील यांनी विधानसभेतील लेखी उत्तरात दिली. महासंघाच्या उपविधीनुसार सदस्य संघाकडून त्याच्या संकलनाच्या पाच टक्के दूध पुरवठा महासंघास केला जात नसल्यामुळे महासंघाच्या दूध संकलनात घट झाली आहे.
परिणामी, गोरेगाव येथील महानंदच्या ट्रेटा पॅकसाठी दूध मिळत नसल्याने सैन्य दलाला दूधपुरवठा करण्याचा ठेका रद्द झाला आहे. तसेच दूध पुरवठ्याअभावी महासंघाची प्रकल्प क्षमता, कर्मचारी यंत्रणेचा पुरेपूर वापर होत नसल्यामुळे महासंघाची आर्थिक स्थिती ढासळली आहे.
महानंदला राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळात (एनडीडीबी) सामावून घेण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. मंडळाने त्याबाबतचे सर्वेक्षणही केले आहे. मात्र एनडीडीबीला महानंदाकडील अतिरिक्त मनुष्यबळाची गरज नाही.
सध्याच्या महानंदकडे ९४० कर्मचारी आहेत. मात्र एनडीडीबीने कामगार कपात करून केवळ ४५० कर्मचारी कायम ठेवू, अशी अट ठेवली आहे.
त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीसाठी प्रयत्न करू. स्वेच्छानिवृत्तीचा तिढा निर्माण होऊ नये यासाठी युनियनने दोन पावले पुढे आले पाहिजे. युनियनशी चर्चा करून महानंदला या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती विखे-पाटील यांनी दिली.
यंत्रसामुग्रीनुसार महानंदची ९ लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. मात्र महासंघाकडे सध्या ४० हजार लिटरही दूध येत नाही. म्हणजे ७० टक्के दूध खासगी संस्थांना देण्यात येत असून, केवळ ३० टक्के दूध महानंदकडे येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
