आश्वी बु. (ता. संगमनेर) येथील सामाजिक व धार्मिक क्षेत्रात सक्रिय कार्य करणारे तसेच भारतीय हवाई दलात वारंट ऑफिसर म्हणून दीर्घकाळ देशसेवा बजावलेले सेवानिवृत्त गणपत मारुतराव जगताप (वय ६४) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने दोन्ही आश्वी गावांसह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, देशसेवा व समाजसेवेचा संगम जपणारे कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
भारतीय हवाई दलात वारंट ऑफिसर म्हणून राष्ट्रसेवेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर त्यांनी गावातील सामाजिक व धार्मिक कार्यात स्वतःला झोकून दिले. साप्तश्रृंगी माता नवरात्रोत्सव, हनुमान अखंड हरिनाम सप्ताह, हनुमान चालीसा, रामनवमी उत्सव तसेच विविध धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असे. पंढरपूर, ताराहाबाद आदी तीर्थक्षेत्रांच्या पायी वारीतही ते श्रद्धेने सहभागी होत असत. अलीकडेच आश्वी येथील शनि मंदिराच्या जीर्णोद्धारातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
सामाजिक आणि धार्मिक कार्यात व्यस्त राहूनही त्यांनी आपल्या कुटुंबाला उच्च शिक्षणाची दिशा देत आदर्श पिढी घडविली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, भावजया, दोन मुले, सुना, पुतणे व नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील विवेक जगताप व हितेश जगताप यांचे ते वडील होत. तसेच ते आश्वी खुर्द येथील सोनवणे परिवाराचे जावई असून रमेश (कैलास) सोनवणे यांचे मेव्हणे होते.
अंत्यसंस्कारावेळी परिसरातील सुमारे २० माजी सैनिकांनी उपस्थित राहून पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर मानवंदन सॅल्यूट देत आपल्या सहकाऱ्याला भावपूर्ण मानवंदना अर्पण करून अखेरचा निरोप दिला. या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांचे डोळे पाणावले.
गणपतराव जगताप यांच्या निधनाने दोन्ही आश्वी गावांसह परिसराने देशभक्त, कर्तव्यदक्ष आणि समाजहिताची जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व गमावले असून सर्व स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.