संगमनेर । झुंझार न्यूज

अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेतर्फे स्थापन करण्यात आलेले अमृतवाहिनी विद्यापीठ येत्या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होणार आहे. राज्य शासनाने विद्यापीठाला मान्यता दिल्यानंतर कॉस्मेटोलॉजी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, अभियांत्रिकी, व्यवस्थापन तसेच विविध प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

या विद्यापीठामुळे संगमनेरसह उत्तर महाराष्ट्रातील उच्च शिक्षण, संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

 

उच्च शिक्षणाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासोबतच संशोधनाला चालना आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमृतवाहिनी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. २ जुलै २०२६ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यापीठाला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संबंधित विधेयकाला विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर अमृतवाहिनी विद्यापीठ कार्यरत झाले.

पाच दशकांची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा

अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेची स्थापना १९७८ मध्ये सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या संस्थेने बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच दशकांत शिक्षणाच्या विविध क्षेत्रांत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, कृषी तसेच शालेय शिक्षण अशा विविध क्षेत्रांत संस्थेने विस्तार केला असून, येथून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी देश-विदेशातील विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत, असे संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयू देशमुख यांनी सांगितले.

अमृतवाहिनी परिवारात सध्या अभियांत्रिकी महाविद्यालय, पॉलिटेक्निक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), एमबीए, फार्मसी, कृषी महाविद्यालय, फूड टेक्नोलॉजी, ज्युनियर कॉलेज, मॉडेल स्कूल आणि इंटरनॅशनल स्कूल, निडो इंटरनॅशनल आदी सुमारे बारा शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत.

गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा आणि संशोधनाभिमुख उपक्रम ही अमृतवाहिनी परिवाराची प्रमुख ओळख राहिली आहे. याच शैक्षणिक परंपरेचा विस्तार विद्यापीठाच्या माध्यमातून होणार आहे.

जागतिक दर्जाच्या शिक्षणावर भर

अमृतवाहिनी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधनाच्या संधी आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे हा विद्यापीठ स्थापनेमागील प्रमुख उद्देश असल्याचे सौ. शरयू देशमुख यांनी सांगितले.

विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी संशोधनाच्या दृष्टीने आवश्यक प्रयोगशाळा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि विविध शैक्षणिक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासोबतच परदेशातील विद्यापीठांशी सामंजस्य करार करून आंतरराष्ट्रीय प्राध्यापक व तज्ज्ञांच्या सहभागाच्या संधी निर्माण करण्यात येणार आहेत.


अमृतवाहिनी विद्यापीठामुळे संशोधन, नवोपक्रम, उद्योग-संस्था सहकार्य, कौशल्याधारित शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




“अमृतवाहिनी विद्यापीठाच्या स्थापनेमुळे आमची जबाबदारी निश्चितच वाढली आहे. मात्र, या माध्यमातून काळाशी सुसंगत आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी संगमनेरमध्ये उपलब्ध होतील, असा आम्हाला विश्वास आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि भविष्याभिमुख शिक्षण देण्यासाठी अमृतवाहिनी विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावेल.”

— सौ.शरयू देशमुख

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *