लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
संगमनेर । झुंझार न्यूज
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर येथे भव्य जयंती उत्सव व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे हा सोहळा होणार असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा तसेच गुणवंत विद्यार्थी व समाजभूषणांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती अनुसूचित जाती-जमाती विभाग काँग्रेसचे संतोष गायकवाड यांनी दिले आहे.

माहिती देताना ते पुढे म्हणाले की, सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन मंच, संगमनेर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सन २०२५ – २६ मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षेत ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील मातंग समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचा सन्मान मातंग समाजातील पहिल्या आयएएस कु.प्रेरणा कैलास खवळे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, प्रसिद्ध साहित्यिक व ‘पानिपत’कार तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील हे ‘परिवर्तन चळवळीतील साहित्यिक सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीशी असलेला संबंध आणि त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता यावर विचारमंथन होणार आहे. या सोहळ्यास माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषद सदस्य आ.सत्यजित तांबे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर, संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉ.सौ. मैथिलीताई तांबे तसेच संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे उच्चपदस्थ अधिकारी, गुणवंत विद्यार्थी तसेच समाजासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. मातंग समाजाला शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय प्रवाहात प्रभावीपणे आणण्यासाठी उपवर्गीकरणाची नितांत गरज असल्याचा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात येणार आहे. ‘उठ मातंगा, जागा हो; संघर्षाचा धागा हो’ या घोषवाक्याने समाजातील शैक्षणिक व सामाजिक जागृतीला चालना देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. गुणवंत विद्यार्थी सत्कारासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आपले मार्कशीट व संबंधित माहिती आयोजकांकडे सादर करावी. नोंदणीसाठी विजय खरात : ८६०५७५१०३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष गायकवाड, दत्तात्रय औचिते, दीपक खरात, इंजि. संकेत आल्हाट, सोनू गायकवाड, विजय खरात, स्वप्निल चव्हाण, रवी शिंदे, अजित आल्हाट, विशाल खरात, मधुकर पवार आदी प्रयत्नशील आहेत.



