साई निर्माण ग्रुपच्या वतीने आयोजित बहुचर्चित ‘१२ ज्योतिर्लिंग संकल्प पूर्ती यात्रा’ ३१ ऑगस्ट रोजी पवित्र बनारस (काशी) नगरीत मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात दाखल झाली. या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण काशी नगरी काही काळासाठी ‘साईमय’ झाल्याचे पाहायला मिळाले. हजारो साई भक्तांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्याने बनारसच्या अध्यात्मिक वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण केला.
यात्रा काशी नगरीत पोहोचताच स्थानिक साई भक्त राजेश अरोरा आणि इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते साई पालखीची अत्यंत विधिवत महाआरती करण्यात आली. या महाआरतीच्या वेळी संपूर्ण परिसर मंत्रोच्चार आणि भक्तीच्या वातावरणात दुमदुमून गेला होता. आरतीनंतर ढोल-ताशांचा दणदणाट, बँड पथकाची सुरावटी आणि ‘ओम साई नमो नमः जय जय साई नमो नमः’ तसेच ‘हर हर महादेव’ च्या अखंड जयघोषात एक भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात हजारो साई भक्त उत्साहाने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या तालावर नाचत भक्तांनी यात्रेचा आनंद द्विगुणित केला.
I
शोभायात्रा निघून श्री काशी विश्वनाथ मंदिराकडे मार्गस्थ झाली. संपूर्ण काशी विश्वनाथ कॉरिडॉर साई भक्तांच्या अफाट गर्दीने फुलून गेला होता. यात्रेत सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आराध्य दैवत श्री काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. बाबांच्या व महादेवाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर निनादला होता.
साई निर्माण ग्रुपच्या वतीने सर्व यात्रेकरूंच्या राहण्याची, जेवणाची आणि सुलभ दर्शनाची अत्यंत उत्तम सोय करण्यात आली होती. या भव्य यात्रेत महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांची लक्षणीय उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी साई निर्माण ग्रुपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन विशेष परिश्रम घेतले. हा सोहळा केवळ एक धार्मिक यात्रा न राहता, भक्ती, संस्कृती आणि शिस्तीचा एक अद्वितीय संगम ठरला, ज्याची गोड आठवण बनारसवासी आणि यात्रेकरूंच्या मनात कायम राहील.