गणेश परिसरात समृद्धी निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न
विराट सभेद्वारे थोरात कोल्हे गटाची प्रचार सांगता
राहता / झुंजार न्यूज
पूलतांबा येथे श्री गणेश परिवर्तन मंडळाच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक भैय्या कोल्हे होते यावेळी व्यासपीठावर नारायणराव कारले, अरुण पाटील कडू ,सौ प्रभावती ताई घोगरे ,माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांसह सर्व उमेदवार व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर आणि संजीवनीच्या सहकारी संस्था उत्तम रीतीने सुरू आहेत. येथील लोकप्रतिनिधी हे बाहेरच्या तालुक्यात बिघडायला जातात. आम्ही मात्र घडवायला आलो आहे. निळवंडे धरणाचे काम आणि कालवे कोणी केले हे जनतेला माहिती आहे. हे फक्त प्रसिद्धीचे काम करतात .आठ वर्षात गणेश मधी काहीही केले नाही .उलट कारखान्याची परिस्थिती खालावली आहे. गणेशला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. संगमनेर आणि संजीवनी प्रमाणे हा कारखाना चालवू, सभासद ,शेतकरी आणि कामगारांचे हित जोपासण्याचे काम आपण सर्वांच्या साथीने करू. या परिसरात दहशतीचे व दडपशाहीचे राजकारण या निवडणुकीच्या निमित्ताने उडवून टाका. तुम्हाला खरे स्वातंत्र्य पाहायला मिळेल असे आमदार थोरात यांनी म्हटले आहे

तर विवेक भैय्या कोल्हे म्हणाले की, आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश परिसराचा विकास आपण पूर्वीप्रमाणे करू. शंकरावजी कोल्हे यांचा वारसा आपल्याला समृद्ध असून मी कायम तुमच्या सोबत आहे .येथे दडपशाहीचे राजकारण आहे. मात्र संतांच्या भूमीतून आपण स्वातंत्र्याचा मूलमंत्र घेऊन गणेश कारखान्यात परिवर्तन घडवत गणेश परिवर्तन मंडळाला मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले. यावेळी अरुण पाटील कडू ,सौ प्रभावती घोगरे आदींसह विविध मान्यवरांची भाषणे झाली
प्रचंड सभेने सांगता
आमदार थोरात व विवेक कोल्हे यांच्या प्रत्येक सभेला मोठी गर्दी झाली असून परिवर्तनाची सुरुवात झाली असल्याची नांदी प्रत्येक सभेतून पाहायला मिळत आहे. पुणतांबा येथील सभेत विराट गर्दी व सभासदांची उपस्थिती हे वैशिष्ट्य ठरल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे
