ग्रामीण भागातील पत्रकारांनी समस्या व अडीअडचणी डोळसपणे मांडाव्यात – अण्णासाहेब भोसले

 

आश्वी | झुंजार न्यूज

 

सुरवातीच्या काळात वृत्तपत्रे, साप्ताहिके व मासिके ही केवळ शहराच्या ठिकाणी येत असत. त्यानतंर दोन तीन दिवसांनी ग्रामीण भागात ती पहावयास मिळत होती. आचार्य अंत्रे, लोकमान्य टिळक, परुळेकर सारख्या पत्रकार व वक्त्यांनी त्याकाळी समाज जागृतीचे काम केले. त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी वृत्तपत्रांनी मोठे योगदान राहिले आहे. यांचा आदर्श घेऊन ग्रामीण भागातील पत्रकारांनी आपल्या परिसरातील समस्या व अडीअडचणी डोळसपणे मांडण्याचे आवाहन जेष्ठ मार्गदर्शक अण्णासाहेब भोसले यांनी केले आहे.

 

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील प्रवरेच्या कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयात सोमवारी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना जेष्ठ नेते आण्णासाहेब भोसले बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सीताराम चांडे, सार्वमतचे रवींद्र बालोटे, संजय गायकवाड, योगेश रातडीया, राजेश गायकवाड, शरद ढमक, अनिल शेळके, भगवान लांडे, समर्थ वाकचौरे, शकुर तांबोळी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुवर्णा जाधव, उप प्राचार्य देवीदास दाभाडे, प्रा. सुनंदा पाचोरे, प्रा. दीपावली तांबे आदि उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित पत्रकाराचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 

प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार सीताराम चांडे मार्गदर्शन करताना म्हणाले की, समाज माध्यमांचा वापर ही काळाची गरज असली तरी समाजमाध्यमात आलेली कोणतीही पोस्ट दुसऱ्याला फॉरवर्ड करण्याआधी तीचे गांभीर्य समजून घेणे गरजेचे आहे. वृत्तपत्रांचे वाचन केल्यामुळे भविष्यातील ध्येय निश्चित करण्यास मोठा फायदा होणार असल्याचे सांगताना पत्रकार सीताराम चांडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी डिग्री हे टार्गेट ठेवून शिक्षण न घेता वर्तमान व भविष्यकाळ घडविण्यासाठी पुस्तकाच्या पलिकडचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी वृत्तपत्र वाचणे गरजेचे असल्याचे म्हटले. तर “जीत और हार सिर्फ आपकी सोच पर निर्भर करती है। मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी।” या वाक्याने त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला असता, विद्यार्थ्यानी टाळ्याचा कडकडाट करत त्याच्यां भाषणाला दाद दिली.

 

याआधी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उप प्राचार्य देवीदास दाभाडे म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकर यांनी भाऊ महाजन यांच्या मदतीने ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या मराठीतील पहिल्या वृत्तपत्रांचे लोकार्पण केल्याचे सांगितले. तसेच समाजाचे प्रबोधन व जागृती करण्याचे काम वृत्तपत्रांच्यामाध्यमातून पत्रकार करत असल्याचे म्हटले आहे.

 

दरम्यान यावेळी आयोजित कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. अश्विनी आहेर व नितु मांढरे यांनी केले. आभार प्रा. गणेश खेमनर यांनी मानले असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे कर्मचारी रामभाऊ ताजणे व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed