संगमनेर झुंजार न्यूज
गतवर्षी कमी पाऊस झाल्याने यंदा मार्चच्या शेवटी तालुक्यातील काही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या भेडसावत आहे. सध्या टंचाईग्रस्त १७ गावे आणि ५२ वाड्या वस्त्यांना १२ टँकरद्वारे दिवसाला ४०-४२ खेपा द्वारे ४ लाख ८४ हजार ३४० लिटर सरकारी पाण्या द्वारे टंचाईग्रस्त नागरिकांची तहान भागवली जात आहे. यासाठी काही विहिरी आणि बोरवेल अधिग्रहित करण्यात आले असल्याची माहिती पंचायत समितीच्या टंचाई शाखेतून देण्यात आली.

तालुक्याच्या काही भागात सध्या नागरिकांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची पाणी टंचाई निर्माण झाली आहे.सध्या पंचायत समितीच्या मार्फत १७ गावांना व ५२ वाड्या वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती टंचाई विभागाचे प्रमुख संजय अरगडे यांनी दिली. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये अत्यंत अल्प पाऊस पडल्यामुळे तालुक्याला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जनावराच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच लोकसभेच्या निवडणुकीची आचारसहिता जाहीर झाल्याने शासकीय अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामकाजाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. निळवंडे उजव्या व डाव्या कालव्यातून जवळपास चार टीएमसी हून अधिक पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पाटालगतच्या गावा मध्ये विहिरीतील पाण्याची पातळी वाढली होती मात्र आता ती खाली जाऊ लागल्याने सर्वच ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. निळवंडे कालव्यातून पुन्हा शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र वितरण प्रणाली शेवट पर्यंत नसल्यामुळे अनेक गावांना पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.त्यात पाटातून मोठ्या प्रमाणावर पाझर होत असल्यामुळे पाटाला लायनिंग अस्तरीकरण चे कामे काही ठिकाणी सुरू करण्यात आले असल्याची माहिती आहे. संगमनेर तालुक्यामध्ये यावर्षी ६६ गावे टंचाई घोषित करण्यात आली आहेत मात्र सध्या सतरा गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यानंतर मागणीनुसार इतर गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. तालुक्यातील पानोडी, कुंभारवाडी, खरशिंदे ,सोनूशी, सायखींडी , खंडेरायवाडी ,हिवरगाव पठार, कर्जुले पठार गुंजाळवाडी पठार, पोखरी बाळेश्वर, माळेगाव पठार, चिकणी, पिंपळगाव देपा, डोळासणे, शेंडेवाडी, बिरेवाडी, आदी गावांना तसेच हजारवाडी, कणसेवाडी, गावठाण, ठाकरवाडी, रहाटे वस्ती, गीते वस्ती, सानप वस्ती, कारवाडी, म्हसोबावस्ती, गाळ वस्ती पांढरी बोराडे वस्ती पांढरी, दत्तवाडी,मोठेबाबा वाडी, नन्नवरे वस्ती, उपळी ठाकरवाडी, सुतारवाडी पायरवाडी , गिरेवाडी,दगडसोंडवाडी,पठारवाडी, कोळेवाडी,इत्यादी वाडी वस्तीवर सहा शासकीय आणि सहा खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

सध्या तरी या गावांना पाणीपुरवठा होत असला तरी येत्या काही दिवसात अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी संगमनेर खुर्द ग्रामपंचायतच्या प्रवरा नदीकाठी असलेल्या गोड पाण्याच्या दोन विहिरी आधी गृहीत करण्यात आल्या आहेत.औरंगपूर येथे खाजगी विहीर आधी गृहीत केली आहे, जांबुत बुद्रुक येथे बोरवेल आधी ग्रहित केला आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार असून ज्या ठिकाणी पहाणी अंती दीड किलोमीटरच्या परिसरामध्ये पाण्याचा स्रोत आढळल्यास तो अधिग्रहित करण्यात येणार आहे. व जेथे स्रोत कोरडे असतील तेथे टॅंकरने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती टंचाई विभागाकडून देण्यात आली आहे. प्रांताधिकारी शैलेश हिंगे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे.

चौकट
दर पंधरा दिवसांनी पाणी परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे.आगामी काळात मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.त्या दृष्टीने गाव निहाय नियोजन करण्यात आले आहे.खाजगी जल स्रोत देखील ताब्यात घेण्यात येणार आहेत.सध्या पाच गावांमधील ग्रामपंचायतीच्या विहिरी व खाजगी विहिरी ताब्यात घेतल्या आहेत. त्यातून स्थानिक पातळीवर पाणीपुरवठा सुरू आहे.मागील वर्षी खूप कमी पाऊस पडला आहे . केवळ १.७५ मि.ली इतकाच पाऊस पडला आहे. तालुक्यात टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आज मितीस उपलब्ध असलेले पाणी जपून वापरावे असे आवाहन गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी केले आहे.

