संगमनेर । झुंजार न्यूज
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. कृषिमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करून सुविधा निर्माण करून दिली असल्याची माहिती इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिली आहे.

खरीप हंगाम 2023- 24 याकरिता सुरू करण्यात आलेल्या सुविधेबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे नेते व माजी कृषी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या सहा वर्षाच्या कृषी मंत्री पदाच्या काळात अनेक लोकाभिमुख योजना राबवले असून याच कालावधीमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक शेती उत्पन्न करणारे राज्य ठरले होते.

कृषी विद्यापीठ बांधावर , महापीक अभियान ,मागेल त्याला शेततळे ,शिवार फेरी असे अनेक उपक्रम आमदार थोरात यांच्या कार्यकाळात राबवले गेले . शेती संबंधीचे सर्व प्रश्नांची जाण असलेले विधिमंडळातील ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी मिळण्यासाठी पुढाकार घेतला होता.
तसेच यापूर्वीही शेती संदर्भाच्या विविध योजना ऑनलाईन करण्यासाठी यशोधन जनसंपर्क कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करून शेतकऱ्यांना मदत केली आहे.

सन 2024 -25 या खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, मका, बाजरी, तूर ,कांदा या सर्व पिकांची एक रुपयात पीक विमा नोंद होणार असून याकरता यशोधन कार्यालयात स्वतंत्र कक्ष करण्यात आला आहे. येथे इंटरनेट सह सर्व सुविधा असून शेतकऱ्यांनी त्यासाठी आपल्या शेतीचा सातबारा व आठ अ, आधार कार्ड ,बँक पासबुक, सामायिक क्षेत्र असल्यास संमती पत्र ही कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. सकाळी 9 ते 5 या वेळेत ही सुविधा सुरू राहणार असून 15 जुलै 2024 पर्यंत अंतिम तारीख आहे.

तरी या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही इंद्रजीत भाऊ थोरात यांनी केले आहे

