कोपरगाव । झुंजार न्यूज
प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे महत्व अनन्यसाधारण असून आई-वडील हे सर्वांचे प्रथम गुरु आहेत, रामदासीबाबा यांनी कधीच कुठल्याही गोष्टींचा संचय केला नाही तपसाधनेतून जे आत्मसात केले ते इतरांना देत अनेकांना भक्तीसह संस्काराचा मार्ग दाखवला असे प्रतिपादन हभप अरुण महाराज रोहोम यांनी केले.

ब्रह्मलीन संत रामदासीबाबा तीनखणी कोकमठाण येथे गुरुपौर्णिमा उत्सव सालाबादप्रमाणे याही वर्षी रविवारी साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, सूर्य चंद्र प्रकाश देतात नदी सुबत्ता आणते, झाडं हे सृष्टीचे वैभव निर्माण करतात तर संत परोपकार करतात. सद्गुरुचा स्पर्श ज्यांना होतो त्याच्या आयुष्यात नेहमी समृद्धीचा वास असतो. आपल्याला कुणाचे चांगले करता आले नाही तर वाईट कधीच करू नये. अध्यात्म मनुष्याला सन्मार्ग दाखवत असते. गुरुनिष्ठा प्रत्येकाने जपावी. कलियुगात वाट लावणारे भरपूर असतात, पण सद्गुरूच सन्मानाची वाट दाखवत असतो. ब्रह्मलीन संत रामदासीबाबा यांनी ४० वर्षांपूर्वी कोकमठाण कारवाडी येथे शुक्लेश्वर महाराज मोरविसकर यांना सप्ताह सुरू करण्याची आज्ञा केली होती, आयुष्यात चांगल्या गोष्टींचा संग्रह करा, वाईट गोष्टीचा त्याग करा असे ते शेवटी म्हणाले. रामदासी बाबांच्या मूर्तीस ग्रामस्थ पुरोहित रावसाहेब जोशी, सुभाष जोशी, पदे गुरुजी यांनी मंत्रघोषाद्वारे महामस्तकाभिषेक, छाया व संभाजी विश्वनाथ सदाफळ यांच्या हस्ते लघुरुद्र करण्यात आला. रामदासी बाबांच्या जीवन कार्यावर कृष्णा गोदाकाठचे योगी रामदासी बाबा, तिनखणीचा रामानुभव, समर्थ विचारधारा या तीन पुस्तकाचे लेखन करणारे नेवासे येथील सेवानिवृत्त शिक्षक रंगनाथ किसन डहाळे संपूर्ण परिवारासह यावेळी उपस्थित होते. रामदासी बाबा भक्त मंडळाच्या सर्व सदस्यांनी भाविकांना लापशी, मसालेभाताचा महाप्रसाद वाटप केला.

