गर्विष्ठ सरकारला जाब विचारण्यासाठी देशातील तरुणाई सज्ज – डॉ.जयश्रीताई थोरात
संगमनेर । झुंझार न्यूज
दिल्ली येथे जंतर – मंतर वर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात लाठी हल्ला झाला. विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार झाले. यानंतर या आंदोलनाला मोठ्या संघर्षातून यश मिळाले असून विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संगमनेर मध्ये काँग्रेस सह सर्व समविचारी पक्षांनी स्वागत केले असून केंद्रातील गर्विष्ठ सरकारला जाब विचारण्यासाठी देशातील तरुणाई सज्ज झाली असल्याचे संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे.

संगमनेर बस स्थानक येथे संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेस, छात्र भारती, शिवसेना,अंधश्रद्धा निर्मूलन, सत्यशोधक समाज, दलित पॅंथर, शेतकरी संघटना, एनएसयुआय, महिला संघटना व सर्व पुरोगामी संघटना व विद्यार्थी संघटनांच्या वतीने या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा बद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, मागील 28 दिवसांपासून दिल्ली येथे जंतर – मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. २० जुलै रोजी विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठी हल्ला केला. अनेक युवक व युवती जखमी झाल्या याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. शिक्षण व्यवस्थेत मोठा भ्रष्टाचार असून शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा पहिला हवा होता. केंद्र सरकारला खूप उशिरा जाग आली मात्र तरुणाई पुढे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली असून हा राजीनामा झाला अजूनही अनेक प्रश्न बाकी आहेत यासाठी लढाई करावी लागणार आहे.
गर्विष्ठ झालेल्या केंद्रातील सरकारला जाब विचारण्यासाठी तरुणाई आता सज्ज झाली असून देशातील राज्यघटना लोकशाही टिकवण्यासाठी आता तरुणांनी संघटितपणे एकत्र येऊन काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

तर सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, हे विद्यार्थी कोणत्या पक्षाचे नव्हते ते देशाचे भवितव्य होते.मात्र सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले अमानुषपणे त्यांच्यावर हल्ला केला. अनेक मुलींचा छळ झाला. भर पावसामध्ये हे मुलं रस्त्यावर झोपत होते. अतोनात हाल त्यांचे झाले. ब्रिटिश सुद्धा असे वागत नव्हते इतके क्रूरपणे केंद्र सरकार वागले आहे. मात्र तरुणांनी त्यांना त्यांची जागा आता दाखवली आहे तरुणांनी अशीच देशासाठी एकजूट ठेवावी असे त्यांनी म्हटले.
यावेळी शिवसेनेचे अमर कतारी, ॲड रंजना गवांदे, तुषार पानसरे, शेखर सोसे यांनीही केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली.यावेळी विविध पक्षांचे कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

झेन झी चा जल्लोष
केंद्र सरकारचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा उशिरा झाला मात्र सरकारला तरुणाईने नमवले या आनंदोत्सवात संगमनेर वरील युवकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत उत्साह साजरा केला याचबरोबर यापुढील काळात लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी आम्ही एकत्रितपणे लढू असे म्हणून झेन जी जिंदाबाद च्या घोषणा दिल्या.

