मे महिन्यात मागणी वाढण्याची शक्यता ? तर जलजीवन योजना पुर्ण झाल्यास टँकरची आवश्यकता भासणार नाही

अहिल्यानगर । झुंजार न्यूज

गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तुलनेत यंदा उन्हाळ्याची दाहकता कमीच आहे. मात्र तरीही जिल्ह्यात एप्रिलमध्येच ५४ टँकरने पाणी पुरवठा सुरू करावा लागला आहे. यात सर्वाधिक १९ टँकर पारनेर, संगमनेरात १६, पाथर्डी ११ आणि नगर तालुक्यात ८ टँकर सुरू आहेत. मे महिन्यात टँकरचा हा आकडा आणखी वाढणार असल्याचे संकेत आहेत.

सन २०२३ मध्ये पाऊस कमी पडल्याने त्याचा परिणाम २०२४ मध्ये पाहायला मिळाला. गेल्या वर्षी २०२४ मध्ये भीषण टंचाई पाहायला मिळाली. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात २४ टँकर सुरू करावे लागले होते. एप्रिलमध्ये हाच आकडा १०६ पर्यंत पोहचला होता. तर मे महिन्यात जिल्ह्यातील २९३ गावे, १ हजार ५७८ वाड्यांना ३१६ पाण्याचे टँकर सुरू करावे लागले होते. त्यामुळे गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. त्यानंतर जुनपासून पावसाळा सुरू झाला.

Oplus_131072
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही सरासरी पाऊस झाला. धरणे चांगली भरली, छोटी मोठी तलावेही ओसंडून वाहताना दिसली. ओढे नालेही भरून वाहिली, यातून भूजल पातळीही चांगली वाढलेली दिसली. त्याचा चांगला परिणाम २०२५ च्या उन्हाळ्यात पहायला मिळाला आहे. सध्या शेती व पिण्याच्या पाण्याच्या आवर्तने सुरू आहेत. अनेक भागात भूजल पातळी अजुनही बरी आहे. त्यामुळे उन्हाची दाहकता तशी कमीच जाणवत आहे. असे असतानाही काही गावांच्या नशीबी टँकर पाचवीलाच पुजलेले आहे. जलजीवन योजनांमुळे तरी त्या गावांचा टँकरचा वनवास थांबेल , अशी अपेक्षा होती , मात्र काही गावांना अजून ही टँकरवरचं तहान भागवावी लागत आहे .

Oplus_131072

जलजीवन योजनेतून उन्हाळ्यात ज्या गावांना टँकर लागतात, त्या ठिकाणी प्राधान्याने योजना पूर्ण करण्याच्या शासनाकडून सूचना होत्या, असे समजते. त्यामुळे दरवर्षी टँकर लागणाऱ्या किती गावांत योजना पूर्ण झाल्या आणि योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने टैंकर यंदा बंद आहेत, याची आकडेवारी समोर आल्यानंतर योजनेचे यश आणि अपयश दिसून येणार आहे. अर्थात त्यासाठी मे महिन्याची वाट पहावी लागणार आहे.

Oplus_131072
जिल्ह्यातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने विहिरी तसेच बोअरवेल्स अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संगमनेर तालुक्यातील एक गावासाठी आणि दोन टैंकर भरण्यासाठी अशा तीन विहिरी, बोअरवेल्स अधिग्रहित केल्याचे प्रशासनाकडून समजले.
Oplus_131072
सध्या जिल्ह्यात ४६ गावे आणि २१८ वाड्या वस्त्यांवरील १ लाख नागरिकांसाठी शासकीय १५ आणि खासगी ३९ असे ५४ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. टँकरच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed