आश्वी । झुंजार न्यूज
संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे माजी चेअरमन तथा संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी अंभोरे येथे विविध गणेश मंडळांना सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या शुभहस्ते “श्रीं”ची आरती उत्साहात संपन्न झाली.

रणजितसिंह देशमुख यांन सर्वप्रथम मातोश्री प्रतिष्ठान, आमनटेक, संघर्ष एकता गणेश मंडळ, जय बजरंग नव युवक गणेश मंडळ, गावठान, एकता गणेश मंडळ, वडाची खोरी अशा विविध मंडळांना भेटी देऊन आरती केली. विशेषतः अंभोरे गावठान येथील जय बजरंग नव युवक तरुण गणेश मंडळाने तोफांची सलामी देत आणि फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
यावेळी हनुमान मंदिर आणि परिसरात केलेली विद्युत रोषणाई, आकर्षक स्वागत कमान, तसेच गणेश भक्तांचे स्वागत करणारे फ्लेक्स लक्ष वेधून घेत होते.

याप्रसंगी रणजितसिंह देशमुख म्हणाले की , “आपला देश धर्मनिरपेक्ष असून सर्वांना सामावून घेणारा जगातील एकमेव देश आहे. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून ग्रामीण भागात आजही आपण सर्व एक आहोत, हे दाखवून देतो. ग्रामीण भागात सुंदर नियोजन करून वाडी-वस्तीवरील सर्वजण या काळात एकत्र येत कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवतात आणि त्यानिमित्ताने महाप्रसादाचेही आयोजन करतात. हा एक मोठा सोहळा या माध्यमातून साजरा होतो. यामागे लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव सुरू केला, त्यांची दूरदृष्टी आणि व्यापक कल्पना एकीसाठी प्रेरणादायक आहे. त्यांचा उद्देश सफल होताना दिसत आहे. त्यांची प्रेरणा घेऊनच गणेशोत्सवाच्या काळात आपण सर्वजण मोठ्या उत्साहात ‘श्रीं’चे स्वागत करून स्थापना करतो आणि दहा दिवस विविध कार्यक्रम राबवून ‘हम सब एक है!’ हा संदेश देतो.” त्यांनी गणेश मंडळांचे कौतुक केले आणि तरुण युवकांनी असेच संघटित राहून विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यात सहभाग घेत समाजातील एकता टिकवण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले. सर्व जाती-धर्माचे महिला, पुरुष, युवक, युवती एकत्र येऊन ‘श्रीं’ची आरती, आराधना करतात, त्यानिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करून एकत्र महाप्रसाद घेतात, यातच ऐक्य सामावलेले आहे. हीच एकता अखंडपणे राहो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त करत ‘श्रीं’ना वंदन करून, “तूच जगाचा तारणहार, सर्वांना सुख देणारा आणि दु:खाचे हरण करणारा आहेस!…” अशी प्रार्थना केली. सर्वांना सुख, समृद्धी, उत्तम निरोगी आरोग्य आणि उदंड दीर्घायुष्य लाभो अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी किसनराव खेमनर , रमेश खेमनर , सुभाष हळनोर , डॉ. प्रा. आण्णासाहेब जगनर , तुळशीराम मलगुंडे , हौशीराम वाघमोडे , गोविंद खेमनर , ठका खेमनर तसेचं गावातील विविध स्थानिक संस्थांचे पदाधिकारी, गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, महिला, पुरुष, युवक, युवती, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

