भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग भाव आहे, अंतकरणातून भाव व्यक्त केला तर देव सहज भेटतो, ब्रह्मलीन संत रामदास महाराज यांनी कोकमठाण पंचक्रोशीत भाविकांना अध्यात्म संस्कार दिले असे प्रतिपादन समर्थभक्त प्रसादबुवा रामदासी यांनी केले भिक्षेमुळे अहंकार कमी होतो असेही ते म्हणाले.
श्रीक्षेत्र कोकमठाण येथे ब्रह्मलीन संत रामदास महाराज यांच्या ३६ व्या पुण्यतिथी निमित्त कीर्तन मालिकेत सहावे पुष्प गुंफताना प्रसाद बुवा रामदासी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, संशय विनाशाला नेहमी कारण ठरत असतो तेव्हा व्यर्थ संशय घेऊ नये जे कर्म करायचे असेल ते श्रद्धेने करा अंतकरणातून भाव व्यक्त केला तर मूर्तीला देवत्व येते, भावाने देवाची प्राप्ती होते. कलेला ज्ञानाला आणि विद्येला सर्वत्र महत्त्व आहे. समर्थ रामदासांनी दासबोधातून संसारिक जीवनात सुख आणि समाधान याची कशी सांगड घालायची ही शिकवण दिली आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य, विवेक आणि व्यवहार याचीही ज्ञान दासबोधातून होते.
ब्रह्मलीन संत रामदास महाराज यांनी पवित्र गंगा गोदावरी काठी तपश्चर्या करून आपल्या योग साधनेच्या बळावर कोकमठाणच्या तीनखणीत ऊर्जा निर्माण केली आहे. त्यांच्या पुण्यतिथी सप्ताहातून दरवर्षी प्रत्येकाला अध्यात्माचा आशीर्वाद मिळत असतो. कलियुगामध्ये प्रत्येकाच्या घरात कलह निर्माण झाला आहे. नात्या नात्यातील अंतर दुरावत चालले आहे. आई-वडिलांनी आपल्या संततीवर नियमित अध्यात्म संस्कार करावे. चांगल्या वाईट कर्माची शिकवण द्यावी. संत मंडळींकडे अध्यात्म संस्काराचे धन आहे. समाजाच्या उत्कर्षासाठी संत सतत कार्यरत असतात. ब्रह्मलीन संत रामदास महाराज यांनी कोकमठाण पंचक्रोशीत सतत अध्यात्माचे धडे दिले, चांगले काय आणि वाईट काय याची शिकवण दिली, गीता मनुष्याला उत्कर्षाचा मार्ग सांगते, ते तत्त्वज्ञान त्यांनी दिले. कोकमठाणकर अतिशय भाग्यवान आहेत. गेल्या ३६ वर्षापासून या स्थानावर नामस्मरणाचा सतत जयजयकार होत आहे हा देखील ब्रह्मलीन संत रामदास महाराज यांचाच आशीर्वाद आहे. शेवटी शरद थोरात यांनी आभार मानले.