संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कुंभारवाडी परिसरातून शेतीचे विद्युत पंप (पाणबुडी मोटार) आणि कॉपर केबल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आश्वी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
फिर्यादी बाळासाहेब दत्तु उगले (वय ४२, रा. कुंभारवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही चोरी दि. ३० जानेवारी २०२६ च्या सायंकाळी ७:०० वाजेपासून ते ३१ जानेवारीच्या सकाळी ७:०० वाजेच्या दरम्यान घडली. कुंभारवाडी येथील शेती गट नं. ५१ मधील विहिरीतून चोरट्यांनी संगनमताने विद्युत मोटारी चोरून नेल्या.
या चोरीमध्ये एकूण ४२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. यामध्ये बाळासाहेब उगले यांची १२,००० रुपये किमतीची संजीवनी कंपनीची ५ HP ची मोटार , नवनाथ बन्सी उगले यांची १२,००० रुपये किमतीची ५ HP ची मोटार , विनोद भीमराज दिवटे यांची १०,००० रुपये किमतीची वेगा कंपनीची ५ HP ची मोटार , सुमारे ८,००० रुपये किमतीची २०० फूट लांबीची कॉपर केबल.
या प्रकरणी पोलिसांनी वरंवडी येथील विकास बाळासाहेब ढेरगे , राजू सोमनाथ वर्पे , साईनाथ कैलास वर्पे या तीन तरुणावर गुन्हा दाखल केला असून यापैकी एका आरोपीला आश्वी पोलिसांनी अटक केली असून, त्याचे दोन साथीदार सध्या फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात BNS कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर १३/२०२६ नुसार दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आश्वी पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आश्वी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार शिंदे तपास करत आहे .