महायुतीकडून विकासाच्या मुद्द्यांवर रणनीती निश्चित

मुंबई : झुंझार न्यूज
महाराष्ट्र राज्याच्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याची राजकीय राजधानी असलेल्या मुंबईत हालचालींना वेग आला आहे. परंपरेनुसार, आज मलबार हिल येथील ‘सह्याद्री’ शासकीय अतिथीगृहावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चहापानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. सौ. सुनेत्रावहिनी पवा , जलसंपदामंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी, तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महायुतीतील घटक पक्षांचे सर्व आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चहापानाच्या या कार्यक्रमात केवळ औपचारिकता न पाळता, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध विकासात्मक प्रश्नांवर अनौपचारिक चर्चा करण्यात आली. शेती, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील प्रलंबित विषयांवर अधिवेशनात कशा प्रकारे मांडणी करायची, यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमदारांशी संवाद साधला.

अधिवेशनापूर्वी झालेल्या या बैठकीत महायुतीमधील एकजूट पाहायला मिळाली. विरोधकांच्या संभाव्य आरोपांना आणि प्रश्नांना आक्रमकपणे उत्तरे देण्यासाठी तसेच सरकारने घेतलेले जनहितार्थ निर्णय जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी या चहापान कार्यक्रमाच्या निमित्ताने रणनीती आखण्यात आली.

उद्यापासून सुरू होणारे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्याच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या अधिवेशनात मांडला जाणारा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा असेल, असा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व लोकप्रतिनिधींनी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे
