संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त ,झरेकाठी, येथील ग्रामस्थांनी सकाळी नऊ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
आयोजित कार्यक्रमात शिवचरित्रकार हसन एम. सय्यद यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी सय्यद यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
.
आपल्या व्याख्यानात शिवचरित्रकार हसन एम. सय्यद म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला संविधान वाचण्याचे आवाहन केले. “हे संविधान मी परिपक्व विचार करून, माझ्या रक्ताचे पाणी करून लिहिले आहे. यामध्ये काही त्रुटी वाटल्यास त्या माझ्यासमोर मांडा, आपण त्या दुरुस्त करू,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. संविधान खुलं केल्यानंतर देशातील विविध राज्यांतून सुमारे सात हजार प्रश्न बाबासाहेबांसमोर उपस्थित झाले. तामिळनाडू, मद्रास (चेन्नई), आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा अशा अनेक राज्यांमधून आलेल्या या प्रश्नांना बाबासाहेबांनी अभ्यासपूर्ण व अचूक उत्तरे दिली.
या सर्व प्रक्रियेनंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उदयास आले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकृत झाले आणि २६ जानेवारी १९५० पासून देशाचा राज्यकारभार संविधानानुसार सुरू झाला. बाबासाहेबांनी सांगितले होते की, “संविधान चांगल्या लोकांच्या हातात असेल तर देश सक्षम बनेल; अन्यथा त्याचा योग्य उपयोग होणार नाही.”
सय्यद पुढे म्हणाले की, बाबासाहेबांनी कोणत्याही एका जाती किंवा धर्मासाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी कार्य केले. त्यांनी आपले दुःख विसरून भारताला न्याय, समता आणि बंधुता यांचे तत्त्व दिले. म्हणूनच ते इतिहास घडवणारे महानायक ठरले.
शिवचरित्रकार हसन एम. सय्यद हे महाराष्ट्रातील अभ्यासू आणि चिकित्सक वक्त्यांपैकी एक मानले जातात. त्यांनी आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणादायी इतिहासाच्या माध्यमातून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अनेक व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या या व्याख्यानांमधून अनेक विद्यार्थी यशाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. महाराष्ट्राबरोबरच राज्याबाहेरील विविध ठिकाणीही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासावर व्याख्याने दिली आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र आणि भारतीय संविधान यावर विस्तृत प्रबोधनपर जनजागृतीचे कार्य ते करत आहेत.
आपल्या व्याख्यानातून ते अखंड मानवजातीला एकतेचा संदेश देत असतात. “आपण सर्वजण भारत देशाचे सुपुत्र आहोत. सर्व जाती-धर्मातील बांधवांनी एकत्र येऊन देशाला महासत्ता बनवण्यासाठी एकमेकांच्या विचारांचा आदर केला पाहिजे. मंदिर, मशीद आणि घराच्या चार भिंतींच्या बाहेर पडल्यानंतर आपण सर्वप्रथम भारतमातेची लेकरं आहोत. देशाला महासत्ता बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने राष्ट्रकार्य केले पाहिजे,” असा संदेश त्यांनी दिला.
या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिल्याबद्दल पंचशील मित्र मंडळ, झरेकाठी ग्रामस्थ व सर्व कार्यकर्त्यांचे शिवचरित्रकार हसन एम. सय्यद यांनी आभार मानले. तसेच बाबासाहेब आंबेडकर जयंतीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीही एकत्र येऊन साजऱ्या करण्याचे आवाहन त्यांनी केले. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आश्वी पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. सुधाकर शिरसाठ यांनी भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमास भीम जयंती उत्सव समिती, पंचशील नगर झरेकाठी येथील सर्व कार्यकर्ते, जनसेवा युवा मंचचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी नऊ वाजता भीम जयंती उत्सव समिती, तसेच झरेकाठी ग्रामस्थांच्या वतीने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्नेहभोजनाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते स्नेहभोजनानंतर भव्य अशी मिरवणूक संपन्न झाली