आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून, आता दाढ खुर्द परिसरातील हनुमानवाडी येथे बिबट्याने आपला मोर्चा वळवला आहे. रात्रीच्या सुमारास बिबट्याने शेतकरी अनिल रामभाऊ पाबळे यांच्या वस्तीवर हल्ला चढवत एक शेळी ठार केली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, घटनेला पाच-सहा तास उलटूनही वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल पाबळे हे हनुमानवाडी परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. नेहमीप्रमाणे रात्री त्यांनी आपली जनावरे गोठ्यात बांधली होती. मध्यरात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक वस्तीवर हल्ला केला आणि गोठ्यातील शेळीला ठार केले. सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच शेतकरी विकास मंडळाचे नेते नितीन पाबळे आणि किशोर जोशी यांनी तातडीने पाबळे यांच्या वस्तीवर धाव घेतली. त्यांनी घटनेचा पंचनामा करण्यासाठी आणि पुढील उपाययोजनेसाठी वनविभागाशी वारंवार संपर्क साधला. मात्र, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे घटना घडून पाच ते सहा तास उलटल्यानंतरही वनविभागाचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी घटनास्थळी फिरकला नाही. वनविभागाच्या या उदासीन कारभारामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने वनविभागाने तातडीने येथे पिंजरा लावावा आणि अनिल पाबळे यांना झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी नितीन पाबळे व ग्रामस्थांनी केली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने लक्ष दिले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
दुहेरी संकट! बिबट्यासह चोरांचाही सुळसुळाट
दाढ खुर्द , पिंप्री लौकी अजमपूर , शेडगांव , आश्वी , उंबरी बाळापूर , पानोडी , मालुंजे , खळी , झरेकाठी आणि हनुमानवाडी परिसरात सध्या नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे हिंस्त्र बिबट्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहे, तर दुसरीकडे परिसरात चोरांचाही मोठा सुळसुळाट झाला आहे. रात्रीच्या वेळी बिबट्यापासून जनावरांचे रक्षण करावे की चोरांपासून घराचे, अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. या दुहेरी दहशतीमुळे संपूर्ण गाव भयभीत झाले असून, प्रशासनाने तातडीने गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.



