संगमनेर । झुंझार न्यूज
महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कामगिरी असलेल्या अमृतवाहिनी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून बँकेच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल पुणे येथे ऑल इंडिया सहकारी बँक संमेलनामध्ये उत्कृष्ट डिजिटल व्यवस्थापन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

पुणे येथे ट्रस्ट इन्फो मीडिया यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑल इंडिया सहकारी बँक संमेलन 2026 या कार्यक्रमात संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस उत्कृष्ट डिजिटल व्यवस्थापन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अध्यक्ष गौतम नवीन, फेडरेशनचे राज्य अध्यक्ष अजय ब्रम्हेच्या, प्रसार भारतीचे राज्य अधिकारी उदय जोशी यांच्यासह विविध मान्यवर होते. बँकेच्या वतीने चेअरमन सुधाकर जोशी, व्हा. चेअरमन ॲड.नानासाहेब शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराथी, अंकुर काळे, अमित नारायण यांच्यासह आयटी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अमृतवाहिनी सहकारी बँकेने सभासद व नागरिकांना अत्यंत आधुनिक व चांगल्या सुविधा देताना बँकेमध्ये यूपीआय पेमेंट,एटीएम,आयएमपीएस,मोबाईल बँकिंग या सर्व गोष्टी ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. याचबरोबर अत्यंत सूक्ष्म पद्धतीने नियोजन करून कुठल्याही ग्राहकाची काहीही तक्रार येणार नाही याची काळजी बँकेने घेतली आहे. बँकेचे महिन्याला 50 कोटी पेक्षा जास्त डिजिटल व्यवहार होत आहेत.

या पुरस्कारानंतर बोलताना चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांमध्ये बँकेने बाराशे कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला असून बँकेचा नफा 11 कोटी 17 लाख रुपयांवर पोहोचलेला आहे. हे सर्व करत असताना बँकेने उत्कृष्ट कर्ज व्यवहार स्थापन करत बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के राखला आहे. सर्व ग्राहकांना डिजिटल सुविधा पुरविले असून कोणाची तक्रार येणार नाही याची सातत्याने काळजी घेतली आहे. वर्षाला सुमारे 600 कोटींपेक्षा जास्त डिजिटल व्यवहार बँकेमधून होत असून या कामाची दखल घेत हा पुरस्कार मिळाला आहे यापुढील काळातही सर्वोत्कृष्ट काम करण्यासाठी या पुरस्काराने नक्कीच ऊर्जा मिळेल. याचबरोबर सांघिक कामातून हे यश मिळाले असल्याचे ते म्हणाले.

अमृतवाहिनी बँकेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल बँकेचे मार्गदर्शक मा.महसूल व शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, ॲड.माधवराव कानवडे,डॉ.जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, शंकरराव खेमनर,रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे,अजय फटांगरे,सोमेश्वर दिवटे, संपतराव डोंगरे,बाबा ओहोळ, डॉ.मैथिलीताई तांबे, राजेश मालपाणी यांच्यासह अमृतवाहिनीच्या सर्व संचालक मंडळ आणि विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
