४ जून रोजी संगमनेर येथे गौरव सोहळा
आश्वी । झुंझार न्यूज
सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यातून स्वतंत्र ठसा उमटवणारे सुगाव (ता. अकोले) येथील सामाजिक कार्यकर्ते कल्पित विजयराव वाकचौरे यांची तेजस सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित “राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६” साठी निवड करण्यात आली आहे. सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन संस्थेच्या निवड समितीने एकमताने हा निर्णय घेतला आहे.

भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ‘संविधान अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आणि बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून, तेजस सेवा प्रतिष्ठानने विविध क्षेत्रांतील ७५ आदर्श व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्याचे नियोजित केले आहे. यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, उद्योग व व्यापारी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा समावेश आहे.
तेजस सेवा प्रतिष्ठान ही केंद्र सरकारच्या ‘नीती आयोग’ (NGO Darpan) कडे नोंदणीकृत आणि ISO मानांकित संस्था आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रविंद्र विठ्ठल घोसाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे की, “कल्पित वाकचौरे यांचे विचार आणि कार्य समाजासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरले आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याची दखल घेऊनच त्यांना ‘महाराष्ट्र रत्न’ या मानांकित पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.
पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार, दिनांक ४ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता संगमनेर येथील ‘मालपाणी लॉन्स’ (पंचवटी हॉटेल शेजारी) येथे संपन्न होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संगमनेर शहरात हा सोहळा पार पडत असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या पुरस्काराबद्दल कल्पित वाकचौरे यांचे अकोले तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


