संगमनेर । झुंझार न्यूज
शिक्षण क्षेत्रात आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवणाऱ्या संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाने यंदाही १०० टक्के निकालाची आपली सलग तिसऱ्या वर्षाची देदीप्यमान परंपरा कायम राखली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तम गुण मिळवले असून यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे.
१. ईश्वरी रामदास माळी: ८७.६० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला.
२. सायली एकनाथ सारबंदे: ८५.०० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला.
३. यश बाबासाहेब उंबरकर: ८२.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता ताई विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे दूरध्वनीवरून व संदेशाद्वारे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील मुलांनी जिद्दीच्या जोरावर मिळवलेले हे यश कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी रामभाऊ भुसाळ, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे मॅडम, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, युवक कार्यकर्ते, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सलग तीन वर्ष १०० टक्के निकाल लागल्यामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. हे यश मिळवण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतलेले विशेष परिश्रम आणि पालकांनी दाखवलेला विश्वास यामुळेच हे शक्य झाले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली .

