लोणी । झुंजार न्यूज

 

इर्शाळवाडी येथील घटना अतिशय दुर्दैवी असून, या आपत्‍ती मधील नागरीकांना सर्वतोपरी मदत करण्‍याची भूमिका राज्‍य सरकारने घेतली आहे. या संकटात पशुधन दगावलेल्‍या पशुपालकांनाही मदत करण्‍याबाबत शासन कुठेही कमी पडणार नाही अशी ग्‍वाही महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

पशुसंवर्धन विभागाच्‍या आधिका-यांना याबाबत सर्वतोपरी सुचना देण्‍यात आल्‍या असून, या आपत्‍तीमध्‍ये दगावलेल्‍या जनावरांची संख्‍या समोर असल्‍यानंतर या पशुपालकांना कोणत्‍या प्रकारची मदत करता येईल याचा विचार शासन निश्चित करेल. लम्पि संकटात केलेल्‍या मदतीप्रमाणेच या नैसर्गिक संकटातही सरकार पशुपालकांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

नगर, सोलापूर, खांन्‍देश या भागात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असून, पाऊस व्‍हावा अशी अपेक्षा सर्वांचीच आहे. पहिली पेरणी आता वाया गेली असली तरी, दुबार पेरणीसाठी शेतक-यांना मदत करण्‍याच्‍या दृष्‍टीने सरकारचे नियोजन असल्‍याचे स्‍पष्‍ट करुन, बोगस बियाणे तसेच खतांचे लिंकेज बाबत येणा-या तक्रारींचे गांभिर्य लक्षात घेवून यामध्‍ये आता प्रचलित कायद्यात बदल करण्‍याच्‍या दृष्‍टीने शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. कृषि मंत्र्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली यासाठी समितीही नेमण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाच्‍या उत्‍तर नगर जिल्‍ह्याच्‍या अध्‍यक्षपदी विठ्ठलराव लंघे यांची निवड झाल्‍याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी त्‍यांचा सत्‍कार करुन अभिनंदन केले. जिल्‍ह्यामध्‍ये काम करण्‍याचा त्‍यांचा अनुभव मोठा आहे. त्‍यांना राजकीय पार्श्‍वभूमीही असल्‍याने पक्ष संघटनेचे काम ते अधिक जोमाने पुढे घेवून जातील असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

 

चौकट

 

 

उपमुख्‍यमंत्री म्‍हणून अजीत पवार सरकारमध्‍ये सहभागी झाल्‍याने सरकारच्‍या निर्णय प्रक्रीयेला अधिक गती प्राप्‍त झाली असून, मागील अडीच वर्षात ठप्‍प झालेली विकासाची प्रक्रीया अधिक वेगाने पुढे जाण्‍यास मदतच झाली आहे. आमचा संसार आता उत्‍तम चालला असल्‍याची कोटी त्‍यांनी याबाबत विचारलेल्‍या प्रश्‍नाच्‍या उत्‍तरात केली.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *