श्रीरामपूर । झुंजार न्यूज
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील चार मागासवर्गीय युवकांना अर्धनग्न करून आणि झाडाला उलटे टांगून अमानुष मारहाण केल्याप्रकरणी श्रीरामपूर पोलिसांनी सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींना शनिवारी रात्री अटक केली आहे. गुरुवारी घडलेली या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते.
ग्रामस्थांनी शुक्रवारी हरेगाव बंद ठेवून घटनेचा निषेध करीत आरोपींना अटक करून कठोर कारवाईची मागणी केली होती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, दलित संघटनांचे कार्यकर्ते आदींनी रुग्णालयाला तातडीने भेट दिली.
राधाकृष्ण विखे यांनी घटनेचा तपशील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. सहा आरोपींपैकी पप्पू पारखे आणि दीपक गायकवाड या दोघांना अटक करण्यात आली आहे. “पोलिसांना तातडीने कारवाईचे आदेश दिले असून गृहमंत्री फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम पाळावा आणि बंद करू नये,” असे आवाहन पालकमंत्री विखे यांनी केले आहे.
गुरुवारी (ता.२५) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हरेगाव येथील चार मागासवर्गीय तरुणांना शेळी आणि चार कबुतरे चोरल्याच्या संशयावरून हरेगाव-उंदीरगाव शिवारात युवराज नाना गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरगे यांनी शेतातील विहिरीकडे नेले. तिथे त्यांना अर्धनग्न करून हात-पाय बांधून उलटे टांगून अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सायंकाळी समाज माध्यमावर व्हायरल झाला. त्यानंतर दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अमानुष मारहाण झालेले चारही मुलांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक संदीप मिटके, श्रीरामपूर शहर आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, दशरथ चौधरी आदींनी घटना स्थळी धाव घेत माहिती घेतली.
कठोर कारवाई करू: पालकमंत्री विखे
हरेगाव येथील घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे.मी स्वतः हरेगाव मध्ये ग्रामसभा घेणार आहे. या ठिकाणी खासगी सावकारी आणि यातून जमिनी बळकवल्यामुळे काही गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण झाल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई कर. गृहमंत्री फडवणीस यांच्याशी मी याबाबत चर्चा केली आहे, अशी माहिती राधाकृष्ण विखे यांनी दिली.
पोलिसांचे दुर्लक्ष : लहू कानडे
या घटनेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला सरकारची भीती राहिलेली नाही असे दिसते. यातील आरोपींवर यापूर्वीच अनेक गुन्हे दाखल आहेत. या आरोपींवर कारवाई करणे गरजेचे आहे,” असे आमदार लहू कानडे म्हणाले. मारहाण करण्यात आलेल्या युवकांमध्ये काही जण अल्पवयीन असल्याचा आरोप कानडे यांनी केला आहे.
