मुंबई । झुंजार न्यूज
बोधीसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 16 डिसेंबर 1956 रोजी महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात धम्म दिक्षा कार्यक्रम घेण्याचा संकल्प केला होता. मात्र त्यापूर्वी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे अधुरा राहिलेला तो संकल्प पूर्ण करण्यासाठी 16 डिसेंबर धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या धम्मपरिषदेत हजारो बौध्द अनुयायांनी उपस्थित राहून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात “चलो बुद्ध की ओर चा नारा” देण्याचा संकल्प पूर्ण केला.
काल लाखो बौद्ध उपासकांच्या साक्षीने जग भरातून आलेल्या बौद्ध प्रतिनिधी आणि बौद्ध भिक्खूंच्या उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चलो बुद्ध की ओर चा नारा दिला. “पिढ्या पिढ्या आम्ही मागत होतो दुसऱ्यांची भिक्षा; आमच्या भीमाने आम्हाला दिली बौद्ध धम्माची दिक्षा; फुलून गेले आहे मैदान रेसकोर्स; कारण या ठिकाणी पोहोचला आहे बौद्ध धर्मियांची फोर्स; आमच्याकडे तसा कसला नव्हता सोर्स तरी या ठिकाणी आला बौद्ध धर्मीयांचा फोर्स” अशी कविता सादर करुन रामदास आठवलेंनी भाषणाला सुरुवात केली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जगात सर्वत्र बौद्ध धम्म प्रसारित झाला आहे. त्याबाबत आम्हाला अभिमान आहे. जगाला युद्धाची नाही तर भगवान बुद्धांची गरज आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्माची दिक्षा देऊन नवजीवन दिले आहे. धम्म क्रांती घडविली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांची संकल्पना आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांचे वारसदार म्हणून आपण काम करीत राहू, असा निर्धार रामदास आठवले यांनी व्यक्त केला.




