दिल्ली । झुंजार न्यूज

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांनी देशातील प्रदूषण आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली. ‘देशातील वाहन उद्योग 12 लाख 50 हजार कोटी रुपयांचा आहे, जो 25 लाख कोटी रुपयांवर नेला पाहिजे. देशातील 40 टक्के वायू प्रदूषणासाठी जीवाश्म इंधन जबाबदार आहे,’ असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. 

 

गडकरी पुढे म्हणाले की, ‘भारत 80 टक्के जीवाश्म इंधन आयात करतो. आम्ही इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांना आता फ्लेक्सी इंजिन असलेली वाहने बनवण्यास सांगितले आहे. इलेक्ट्रिकसह जैव इंधनावर(Bio Fuel) वाहने चालवणे पर्यावरणासाठी तसेच लोकांच्या खिशालाही फायदेशीर आहे. लवकरच भारतात वीज आणि जैवइंधनावर ट्रॅक्टरही चालताना दिसतील.’

 

सार्वजनिक वाहतूकही विजेवर चालवली पाहिजे, जेणेकरून जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व तर संपेलच, पण आपले पर्यावरणही सुरक्षित राहील. दिल्ली ते जयपूर दरम्यान इलेक्ट्रिक ट्रॅकवर बस धावण्याच्या प्रकल्पाबाबत गडकरी म्हणाले की, विजेच्या तारा बसवून दिल्ली ते मुंबई दरम्यान बसेसही चालवता येतील. याशिवाय, ट्रॅक चालवण्याचा लॉजिस्टिक खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

 

गडकरी पुढे म्हणतात, गुजरातमधील वाहन उद्योगाने मोठी झेप घेतली आहे. येथे केलेली गुंतवणूक पूर्ण परतावा देणार. गुजरातमध्ये 12 रोपवे केबल आणि पोर्ट टॅक्सी प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत आणि त्याचा डीपीआर तयार करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातमध्ये 15 लाख जुनी वाहने स्क्रॅप होणार आणि यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादकांना मोठ्या प्रमाणात कच्चा माल उपलब्ध होईल. वाहने स्क्रॅप करून रबर, प्लास्टिक, स्टील, काच आणि तांबे उपलब्ध होतील. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा उत्पादन खर्चही कमी होईल

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *