शिर्डी । झुंजार न्यूज
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात अॅड. राजाराम आढाव व त्यांची पत्नी अॅड. मनिषा आढाव या वकील दांम्पत्याची हत्या झाल्यानंतर शिर्डीसह जिल्ह्यातील वकील संघांनी आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील वकीलांनी २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत न्यायालयीन कामकाजात सहभागी होणार नाहीत असे ठरवले आहे.
राहाता वकील संघाने आज, बुधवारी शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी अॅड. आढाव दाम्पत्य केसचा तपास एस.आय.टी. या तपास यंत्रणेकडून व्हावा, सदर केससाठी विशेष सरकारी वकीलांची नेमणुक करणेत यावी, सदर खटला चालविणेकामी अहमदनगर येथे त्वरीत फास्ट ट्रॅक कोर्टची नेमणुक करणेत यावी, अॅड. आढाव दाम्पत्य केसमधील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होणेबाबत कार्यवाही करणेत यावी, अॅड. आढाव दाम्पत्य यांना न्याय मिळणेसाठी शासनाने सर्व प्रकारच्या यंत्रणेचा वापर करुन केससंबंधी संपूर्ण कागदपत्रे, पुरावे न्यायालयात।सादर करावेत आणि अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट त्वरीत मंजुर व्हावा अशा मागण्या केल्या आहेत.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी अॅड. नितीन विखे, अॅड. योगिनी बेल्हेकर, अॅड. डी. के. धनवटे, अॅड. सविता कामठे, अॅड. सुनिल धिवर, अॅड. सोहेल मनियार, अॅड. अनिल शेजवळ, अॅड. प्रशांत बावके, अॅड. अजय चौधरी, अॅड. विलास आसने, अॅड. काकासाहेब गोरे, अॅड. जे. के. गोंदकर, अॅड. अविनाश शेळके, अॅड. अविनाश शेजवळ, अॅड. संतोष थिटे, अॅड. सचिन कुलकर्णी आदींची उपस्थीती होती.
वकील हे न्याय व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ते पक्षकार आणि न्यायालय यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. परंतु, अॅड. आढाव दाम्पत्यांच्या हत्येनंतर वकीलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. वकील हे न्याय मिळवून देण्यासाठी काम करतात. परंतु, त्यांनाच न्यायासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे वकीलांच्या सुरक्षेसाठी कायदा असणे आवश्यक आहे असे अॅड. अनिल शेजवळ यांनी सांगितले.
