घुलेवाडी येथील युवा संवाद नागरिकांची मोठी उपस्थिती
संगमनेर l झुंजार न्यूज

घुलेवाडी येथे युवा संवाद यात्रेच्या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. जयश्रीताई थोरात, सिताराम राऊत, मिलिंद कानवडे, सरपंच सौ.निर्मलाताई राऊत, सौ.निर्मलाताई गुंजाळ,सौ.सुनीताताई अभंग, राजू खरात, सौ.अमृता राऊत, उपसरपंच दत्तू राऊत, अनिल राऊत, ऋतिक राऊत, नवनाथ अरगडे,भास्कर पानसरे आदींसह घुलेवाडीतील ग्रामस्थ युवक व महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात व डॉजयश्रीताई थोरात यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम संगमनेर तालुक्यात केले आहे. याउलट राहता तालुक्यात त्यांची मोठी दहशत आहे. कोणी विरोधी बोलले तर तंगड्या मोडल्या जात आहे. त्यांच्या कट्टर समर्थकांना विचारले तर ते सुद्धा सांगतील की संगमनेर तालुका हा सर्वात चांगला तर सर्वात दडपशाही राहता तालुक्यामध्ये आहे.

मी आठ वेळेस आमदार राहिलो.सातत्याने जनतेचे काम केले विरोधकांचाही सन्मान केला. कधीही कुणाला अडकाठी निर्माण केली नाही.यांनी आपल्यावर बोलावे ? हे एकदा दक्षिणेत खासदार झाले तरी लोकांनी यांना त्यांची जागा दाखवली. इकडे येऊन विकासाच्या गप्पा करतात. 2014 मध्ये आपला बायपास पूर्ण झाला. नगर – मनमाड हा गजक्यांचा रस्ता अजूनही खड्ड्यांचा रस्ता म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. खासदार, आमदार, मंत्रीपदे अशी साठ वर्षे सत्ता असून काही करता आले नाही. आता एमआयडीसी सांगतात ही एमआयडीसी फक्त निवडणुकीपुरती आहे.

यांच्या भाषणाची पद्धत वैचारिक पद्धत हे अत्यंत दुर्दैवी आहे. पैशाच्या जोरावर ते इकडे येऊन नागरिकांना खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र हा संगमनेर तालुका स्वाभिमानी आहे कधीही विकला जाणार नाही. निळवंडे धरण कालवे आपण पूर्ण केले. या कामांमध्ये आडकाठी निर्माण करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. हे सर्वश्रुत आहे. आणि तोडून मोडून आलेल्या सरकारच्या जोरावर पाणी सोडले. आणि सांगतात की काम कोणी केले हे महत्त्वाचे नाही तर पाणी आम्ही सोडले असे ते सांगतात. अरे ही काय पद्धत आहे का.

मागील अडीच वर्षात संगमनेर तालुक्यातील जनतेला खूप त्रास दिला. परंतु स्वाभिमानी जनता त्यांच्यापुढे झुकली नाही. सर्वांना आपल्या तालुक्याची चांगली संस्कृती, राजकारण, समाजकारण जपायचे आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातून सर्वात मोठा विजय मिळवण्यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी करताना राहता तालुका हा दहशतमुक्त करायचा आहे असेही सांगितले.

तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुका हा विस्ताराने खूप मोठा असून आमदार बाळासाहेब थोरात यांनी अगदी कुटुंबाप्रमाणे सांभाळला आहे. गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. बाहेरून लोक येऊन येथे दडपशाहीचे भाषण करत आहेत त्यांचे भाषणे हावभाव ही संस्कृती आपली नाही. ते घाबरली असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पण मी जशी शांत संयमी आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्या आहे. तशी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांची नात सुद्धा आहे हे ही त्यांनी लक्षात ठेवावे असा इशारा दिला.

यावेळी सिताराम राऊत, हृतिक राऊत यांसह विविध तरुणांनी भाषणे केली. या कार्यक्रमासाठी घुलेवाडी व परिसरातील नागरिक युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध ठिकाणी झालेले उत्स्फूर्त स्वागत हे या युवा संवाद यात्रेचे वैशिष्ट्य ठरले

टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मी चांगल्या पगारावर नोकरीला होते परंतु समाजकारणाचे संस्कार आपल्यावर आहेत.गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी मी काम करत आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांची कार्यकर्ते म्हणून काम करताना जनतेने खूप प्रेम आपल्याला दिले आहे. कुणीतरी राजकन्या हा उल्लेख केला. त्यांचा अभ्यास अत्यंत कमी आहे. या तालुक्यातील मायबाप जनतेला विचारा मी त्यांच्या परिवारातील कन्या आहे असे अभिमानाने डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या यावेळी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला.

