लोणी । झुंजार न्यूज

 

 

 

लोणी खुर्द येथे अतिवृष्टीने नूकसान झालेल्या पिकांची पाहाणी डॉ. सुजय विखे पाटील यांनी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.यहायुती सरकारने मदत जाहीर केली असून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहाणार नाही आशी काळजी घेवून पंचनामे करण्याची सूचना त्यांनी केली.

 

 

 

यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे म्हणाले की, “मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन, कपाशी आणि मका या महत्त्वाच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शासनाने सरसकट पंचनाम्याचे आदेश दिले असून सुमारे ५०% पंचनामे पूर्णत्वाला आले आहेत. शिल्लक पंचनामे लवकर पूर्ण होतील आणि त्यानंतर शासन सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करेल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

ते पुढे म्हणाले की, “अद्यापही पावसाची शक्यता असल्याने पूर्ण नुकसानीचे आकलन करणे अवघड आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि महायुती सरकार ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. राज्यातील कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.”

 

 

डॉ. सुजय विखे यांनी यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, पंचनामे करताना सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करावे. मोठ्या गावांमध्ये किंवा अडचणीच्या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी ड्रोनचा वापर करावा, जेणेकरून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. तसेच पंचनाम्याची वेळ निश्चित करून शेतकऱ्यांना पूर्वकल्पना द्यावी, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाईचा पूर्ण लाभ मिळेल.

 

 

 

दरम्यान, रस्त्यांच्या समस्येबाबत विचारणा झाली असता त्यांनी सांगितले की, “लोकसंख्या वाढ आणि जमिनीच्या वाढत्या भावामुळे अनेकांनी अतिक्रमण केले असून नाले बुजवले आहेत. त्यामुळे रस्ते नकाशावर अस्तित्वात असले तरी प्रत्यक्षात वापरात नाहीत. या समस्यांचा तोडगा प्रेमाने आणि आपुलकीने काढण्याचा प्रयत्न आहे. शेवटी सगळे भाऊबंद असून बाहेरचे कोणी नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *