कर्जत तालुक्यातील होलेवाडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नदीचे पाणी शेजारील वाडी वस्त्यांमध्ये शिरले आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. शंभुराजे देसाई यांच्यासमवेत प्रत्यक्ष भेट देवून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
प्रामुख्याने कुकडी कालव्यातून आलेल्या मोठ्या पाण्यामुळे परिसरात पाण्याचा फुगवटा वाढला होता. या कालव्याच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी तातडीने मान्य केली असून जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी नागेश्वर कालव्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. तसेच, पडवळ वस्तीकडे जाणाऱ्या पुलाचे कामही तातडीने सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. यासोबतच या पायाभूत सुविधा उभारणीमुळे भविष्यात अतिवृष्टीमुळे होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास ग्रामस्थांना देण्यात आला.
होलेवाडी परिसर हा शेतीप्रधान असल्यामुळे कालव्याच्या तुटक दुरुस्तीचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या पिकांवर होतो. त्यामुळे वेळेत उपाययोजना करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे, हा प्रशासनाचा आणि शासनाचा प्राथमिक उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.