छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण
लवकरचं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ही पुर्णाकृती पुतळा उभा रहाणार !
श्रीरामपूर । झुंझार न्यूज
४० वर्षापासूनची श्रीरामपूरकरांच्या स्वप्नपूर्तीची फलश्रुती झाली. सुमारे २० मिनिटांहून अधिकाकाळ सुरू असलेल्या फटाक्याच्या अतिषबाजीने डोळ्यांचे पारणे फेडणारा नयनरम्य सोहळा श्रीरामपूरकरांनी याची देही याची डोळा अनुभवला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजी मंडई समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण करण्यात आले.

यावेळी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील ,आमदार अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, लहू कानडे, महंत अरुणनाथगिरी महाराज, प्रांताधिकारी किरण सावंत, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, उपजिल्हाध्यक्ष दिपक पटारे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, संजय छल्लारे, आशिष धनवटे, राकेश न्याती, केतन खोरे, सागर बेग, राजेंद्र देवकर, अशोक कानडे, प्रदीप वाघ, बाबा शिंदे उपस्थित होते.

ढोलबाजाच्या स्वरात डोक्यावर भगव्या टोप्या, हाती ध्वज घेत शिवप्रेमी दुपारी तीन वाजेपासून लोकार्पण सोहळ्यासाठी पोहचले. व्यासपीठासमोर शिवकालीन साहसी खेळांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास मंत्री सामंत व विखे पाटील कार्यक्रमस्थळी आले. छत्रपतींच्या स्मारकासाठी योगदान देणाऱ्या आजी-माजी आमदार, खासदारांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मंत्री सामंत यांच्या हस्ते कळ दाबून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण करण्यात आले. महाराजांच्या पुतळ्यावरील अच्छादन बाजूला होताच श्रीरामपूरकरांनी जय भवानी, जय शिवाजी असा एकच जल्लोष केला. यानंतर सामंत, राधाकृष्ण विखे व डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

डॉ. सुजय विखे यांच्या नियोजनानुसार करण्यात आलेली फटाक्यांची आतिषबाजी उपस्थितांचे डोळ्यांचे पारणे पेडणारी ठरली. डॉ. सुजय विखे पाटील यांनी माईक हातात घेत नियोजन केले.

या सोहळ्यातच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मिळालेल्या प्रशासकीय मान्यतेचे प्रमाणपत्र मंत्री सामंत, विखे यांच्या हस्ते रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, सुभाष त्रिभुवन, भीमा बागूल यांच्यासह पुतळा समितीच्या सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आले.

श्रीरामपूर तालुक्याचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्याच प्रामाणिक प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळ्याने श्रीरामपूरकरांचा एक संघर्ष संपला असला तरी आता सर्वांच्या साथीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पूर्ती केली जाईल. नॉर्दन ब्रांच ते महात्मा गांधी चौकांपर्यंतच्या रस्त्यासाठी माजी खासदार लोखंडे यांनी पाच कोटी, तर पालकमंत्री बिखे यांनी जिल्हा नियोजनातून दोन कोटी रूपये मंजूर केले आहे.
– डॉ. सुजय विखे पाटील
