संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील चव्हाण वस्तीवर एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने अथक परिश्रमानंतर सुखरूप बाहेर काढले. या थरारक रेस्क्यू ऑपरेशनमुळे बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले असून, गेल्या काही दिवसांपासून दहशतीत असलेल्या ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून चक्रीवादळामुळे परिसरात वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे साकूर रस्त्यावरील कारभारी तुकाराम चव्हाण यांच्या विहिरीवरील विद्युत पंप बंद होता. बुधवारी घरातील पाण्यासाठी अनिकेत शिवाजी चव्हाण आणि त्यांची आई विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेले होते. विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यांना आत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. बिबट्याला पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ही माहिती संकेत तांबे आणि पत्रकार राजेश गायकवाड यांना दिली.
पत्रकार राजेश गायकवाड आणि संकेत तांबे यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधून घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. माहिती मिळताच वनविभागाचे पथक अवघ्या काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि वनविभागाच्या नियोजनामुळे अवघ्या दीड तासांच्या थरारक मोहिमेनंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे, वन मंडल अधिकारी भाऊसाहेब बोकडे, वनरक्षक रामेश्वर मडपे, रेस्क्यु टीम प्रमुख संतोष पारखे, वनरक्षक पवार, धानापुणे, साळवे, कर्मचारी पोपट गागरे, नजीर शेख, उत्तम भूसारी, गोविंद भूसारी, संजय गागरे, रामदास वर्पे यांनी पथकासह तातडीने चव्हाण यांच्या वस्तीवर धाव घेतली.
या मोहिमेत संतोष चव्हाण, महेमुद सय्यद, संकेत तांबे, राजेश गायकवाड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. वनविभागाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि बिबट्याला जेरबंद केल्याबद्दल पानोडी ग्रामस्थांनी वनविभागाच्या पथकाचे आभार मानले आहेत. जेरबंद केलेल्या बिबट्याला पुढील प्रक्रियेसाठी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.