श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागांना जातीय नावाने ओळखले जात असल्याने त्या भागांना महापुरुषांचे अथवा लोकशाही मूल्य दर्शविणारी नावे देण्यात यावीत, अशी मागणी रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने श्रीरामपूर नगर परिषदेवर निदर्शने करण्यात आली आहे. तसे निवेदन श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना रिपाईचे विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन युवक शहराध्यक्ष विशाल सुरडकर यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी बोलताना सुभाष त्रिभुवन म्हणाले की, शहरात मांगवाडा, वडारवाडा, वैदुवाडी, कुंभार गल्ली, गोंड गल्ली, लोणार गल्ली, सिंधी कॉलनी, पंजाबी कॉलनी अशा नावांचा सर्रास उल्लेख केला जातो. एवढेच नव्हे तर या नावांचा वापर पत्रव्यवहार तसेच ऑनलाईन वस्तू मागवितानाही केला जात असल्याची बाब अत्यंत निषेधार्ह आहे. त्यामुळे श्रीरामपूर नगर परिषदेने सर्वानुमते ठराव करून या भागांना छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वीर लहुजी वस्ताद यांसारख्या महापुरुषांची किंवा लोकशाही मूल्य दर्शविणारी नावे द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.
उपविभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल म्हणाले की, जातीयवादी स्वरूपाच्या नावांमुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तातडीने ठराव करून संबंधित भागांना नव्याने नामकरण करावे. अन्यथा रिपाईच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष राजू मगर जय भीम भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सचिन ब्राह्मणे मातंग अस्मिता संघटनेचे जिल्हाध्यक्ष भागचंद नवगिरे समता सैनिक दलाचे दादासाहेब बनकर लहुजी सेनेचे हनीफ पठाण रिपाई चे तालुका उपाध्यक्ष मोजेस चक्रनारायण ख्रिस्ती परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम गोंड समाजाचे नेते कुलजीत जामकर किशोर अभंग बाबासाहेब औताडे दीपक शिंदे कारभारी त्रिभुवन दिलीप सदाशिव अशोक शेळके किरण साळवे नंदू साबळे आवी जामकर महेश जामकर प्रीतम श्रमाके मायाभाई यादव बाळासाहेब साळवे आधी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.