संगमनेर । झुंझार न्यूज
महाराष्ट्रातील आषाढी वारीला शेकडो वर्षांची परंपरा असून या वारीमध्ये विविध जाती धर्माचे लहान थोर सर्व आनंदाने सहभागी होतात. माऊली या एका शब्दाने सर्व बांधले जातात.प्रेमाचा, एकतेचा संदेश देणारी ही महाराष्ट्रातील आषाढी वारी ही जगाला मानवतेचा आणि समतेचा संदेश देणारी असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा वारकरी संप्रदायाचे पाईक माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
वडगाव लांडगा येथे शांताराम लांडगे आयोजित श्री.क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या दिंडी सोहळ्याला शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी समवेत निवृत्ती यशवंत लांडगे, देविदास शिंदे, अशोक लांडगे, डी.एम लांडगे शांताराम लांडगे, संजय लांडगे नवीन शिंदे, बाळासाहेब लांडगे, भाऊसाहेब मुकुंदा लांडगे,विश्वास लांडगे,आनंद वर्पे,अरुण लांडगे यांच्यासह विविध भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विठ्ठल विठ्ठल अखंड हरिनामाचा गजर करत पंढरपूरच्या वाटेने निघालेल्या सर्व वारकऱ्यांना यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षांची मोठी परंपरा आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत गोरोबा, मिराबाई,जनाबाई या सर्व संतांनी मानवता धर्म सांगितला आहे. जात धर्म पंथ याही पेक्षा माणूस म्हणून प्रत्येकाने इतरांचा सन्मान केला पाहिजे. ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. वारकरी संप्रदायामध्ये अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला थारा नाही याविरुद्ध या संतांनी मोठा लढा दिला.

सर्व संतांना तत्कालीन कालामध्ये तथाकथित धर्म मार्तंडांनी छळले आहे. परंतु त्यांनीही समतेचा मंत्र सोडला नाही. आपण सदैव वारकरी संप्रदायाचा विचार जोपासला आहे. पंढरपूरचा पांडुरंग हा सर्व भोळ्या भक्तांचा असून आषाढी वारीचा हा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे.
महाराष्ट्रातील आषाढी वारी ही जागतिक स्तरावरील मोठे आश्चर्य आहे. लाखो लोक एकत्र येतात. विठू नामाचा गजर करतात. यामध्ये जात धर्म पंथ काहीही नाही. इतक्या सर्व भाविकांची ईश्वर कृपेने सहज सोय सुविधा होते सर्व आनंदाने राहतात. हे जगासाठी आश्चर्याची आहे. हा समतेचा वारकरी संप्रदाय आपण सर्वांनी जपला पाहिजे. मात्र सध्या धर्माच्या नावावर राजकारण सुरू आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. या आषाढी वारीमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांना यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक लांडगे यांनी केले तर आयोजक शांताराम सदाशिव लांडगे यांनी आभार मानले.

