संगमनेर : झुंजार न्यूज
समाजाचे दु:ख वेशीला टांगण्यासाठी आश्वीत लोकशाहीर संभाजी भगत यांच्या शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन संयुक्त जयंती महोत्सव समितीने केले आहे.समितीने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे
आज देशात प्रचंड महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचे बाजारीकरण सुरू आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या समस्या अत्यंत गंभीर होत असून सर्वच वर्गसमुहतील लोकांच्या समस्या उग्र रूप धारण करत आहेत. अशा परिस्थितीत मिळालेल्या संविधानिक हक्क अधिकारांची पायमल्ली होत असताना समाज प्रबोधन करणे व आपल्या हक्क अधिकारांचे जतन करण्यासाठी लढा देणे ही बुध्दीजीवी वर्गातील लोकांची सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे .

त्यानुषंगाने संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून मागील एका दशकापूर्वी व्यापक प्रबोधन चळवळ हाती घेतली आहे. समितीने मागील काही वर्षांपासून मोफत अभ्यासिका, कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर्सला अत्यावश्यक किट पुरवठा करणे यासारखे उपक्रम राबविले आहेत. तसेच १४ एप्रिल २०२२ पासुन १० मे पर्यंत २०२२ संविधान जागृती साठी सम्यक धम्म रथ यात्रा आयोजित करुन सुमारे ३२ प्रबोधन सभा आयोजित करून यशस्वी करण्यात आलेल्या आहेत.
समाज प्रबोधनाचा सुयोग्य परिणाम साधला जावा यासाठी संयुक्त जयंती महोत्सव समितीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या “माझ्या दहा सभा जो परिणाम करू शकत नाही; तो परिणाम शाहिरांचं एक गीत करू शकते” !

या विचाराला आधार बनवून सर्व स्तरातील समाज बांधवांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रसिध्द लोकशाहीर संभाजी भगत यांच्या विद्रोही शाहिरी जलसा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

तरी आश्वी परिसरातील तमाम नागरिकांना या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी सन्मानपुर्वक निमंत्रित करण्यात येत आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने शाहिरी जलसा कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
