महाराष्ट्रात सुख-समृद्धी, बंधुभाव नांदू दे-आमदार थोरात यांची पांडुरंग चरणी प्रार्थना !
संगमनेर । झुंजार न्यूज
वारकरी संप्रदाय हा मानवतेचा व समतेचा संदेश देणारा असून या संप्रदायाला मोठी संत महात्म्यांची परंपरा लाभली आहे. आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण असून महाराष्ट्रात सुख-समृद्धी व बंधुभाव नांदु दे अशी प्रार्थना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पांडुरंग चरणी केली आहे
संगमनेर मधील चैतन्य नगर येथील विठ्ठल मंदिरात काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विठ्ठल रुखमाईंचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी समवेत मा. शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, किशोर टोकसे, गणेश मादास, ज्ञानेश्वर महाराज माऊली, गजेंद्र अभंग, चंद्रकांत देशमुख, प्रशांत वामन, वैष्णव मुर्तडक, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ईश्वरचरणी प्रार्थना करताना आमदार थोरात म्हणाले की, आषाढी एकादशीच्या दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. हे पर्व भक्ती भावाचे व परमेश्वराच्या दर्शनाचे असते. प्रार्थना व उपवासाने परमेश्वरा जवळ जाता येते .
समता व मानवतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायाला मोठी वैभवशाली परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर संत , संत तुकाराम, संत चोखामेळा , संत गोरोबा कुंभार, संत रोहिदास, संत जनाबाई, संत एकनाथ महाराज, संत सावता माळी, अशी मोठी संतांची परंपरा या संप्रदायाला लाभली आहे. सर्व समाजातील संतांनी समाजाला मानवतेचा व समतेचा संदेश त्यांनी दिला आहे. हाच मानवतेचा धर्म भारतीय राज्यघटनेत सुद्धा आहे.
आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय झाला असून पंढरपूर मध्ये साधारण वीस लाख भाविक आले आहेत. पंढरपूरच्या वारीत सर्व लोक जात, धर्म, लहान, मोठा असा भेदभाव विसरून एकत्र येतात आणि पांडुरंगाच्या चरणी लिंग होतात.
यावर्षी राज्यात चांगला पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे तसेच महाराष्ट्रात सुख समृद्धी बंधूभाव नांदु दे अशी प्रार्थना ही आमदार थोरात यांनी पांडुरंग चरणी केली आहे .
याप्रसंगी शहरातील वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर हरिनामाचा गजर केला.
