मागासवर्गीय समाजातील पवळाला दीडशे वर्षानंतर ही न्याय नाही

संगमनेर । झुंजार न्यूज

महाराष्ट्र शासनाच्या वतीने कला सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कलावंतांना पुरस्कार देऊन गौरव केला जातो. त्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारास ज्यांचे नाव दिले त्या आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर या कलेच्या क्षेत्रात स्टेजवर प्रथम प्रदार्पण करणाऱ्या महिला होय. तमाशा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या कलावंतांना पवळा तबाजी भालेराव हिवरगावकर यांच्या नावाने राज्य सांस्कृतिक पुरस्कारा अंतर्गत तमाशा लोककला पुरस्कार देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.पवळा भालेराव यांनी ज्या काळात महिला कला क्षेत्रात काम करत नव्हत्या त्या काळात मोठ्या धाडसाने स्टेजवर नृत्य सादर केले. महाराष्ट्राच्या लावणीला मोठ्या उंचीवर नेऊन पोहोचविले. महाराष्ट्राच्या कला,सांस्कृतिक इतिहासात एक सोनेरी अध्याय लिहिला गेला.पवळा भालेराव यांनी पट्टे बापूराव यांच्याबरोबर महाराष्ट्र मध्ये सर्वत्र वगनाट्य लावण्या सादर केल्या. तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर येथील दरबारामध्ये मिठा राणीचे वगनाट्य पट्टे बापूराव यांच्या बरोबर सादर केले, अशा कलेच्या महान साम्राज्ञी नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांचे दिनांक 19 जुलै 2022 रोजीचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्र संकीर्ण 8221 प्र/ क्रमांक 144/ सां.क 4 च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने राज्य सांस्कृतिक पुरस्कारास नाव दिले आहे.

राष्ट्रीय स्मारकाचा प्रस्ताव ग्रामविकास मंत्रालयाकडे दीर्घकाळ प्रलंबित:- नामचंद पवळा भालेराव यांच्या स्मृतीचे कलेचा वारसा जतन करण्याचे कार्य कला सम्राज्ञी पवळा कला मंच, हिवरगाव पावसा ता. संगमनेर जि.अहमदनगर ही नोंदणीकृत संस्था करत आहे. सन 2000 साला पासून नामचंद पवळा भालेराव यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी दाखल केला आहे. सदर प्रस्ताव ग्रामविकास मंत्रालयाकडे दि.1जानेवारी 2020 रोजी वर्ग केला आहे.

दीर्घकाळापासून महाराष्ट्र शासनाकडे सदर प्रस्ताव प्रलंबित आहे. तमाशा या लोककलेच्या क्षेत्रात प्रथम पाऊल ठेवून इतिहास घडविला. स्टेजवर सर्वप्रथम नृत्य सादर करणाऱ्या आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव यांनी महाराष्ट्राच्या लावणीला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले व लावणीला सन्मान मिळवून दिला.

अशा कलेच्या महान सम्राज्ञीची शासन दरबारी उपेक्षा केली जात आहे.नामचंद पवळा यांच्या स्मारकाचा प्रस्ताव दीर्घकाळ प्रलंबित ठेवून महाराष्ट्र शासन महान साम्राज्ञीची विटंबना करत आहे. मृत्यूनंतर 82 वर्षे झाली आहेत पण त्यांच्या स्मारकासाठी शासनाने एक रुपया देखील निधी दिला नाही.

मागासवर्गीय बौद्ध समाजातील कलावंत असल्यामुळे शासन दरबारी त्यांची हेटाळणी केली जात आहे, ही बाब भारतीय राज्यघटनेच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या तत्वाला कलंक लावणारी आहे. शासन आपल्या दारी, सबका साथ! सबका विकास !नामचंद पवळा यांना कधी मिळेल न्याय ? :- कला सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या इतर कलावंतांच्या स्मारकासाठी /इमारत बांधकामासाठी तसेच त्यांच्या जयंती उत्सवासाठी सांस्कृतिक मंत्रालय मार्फत मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. मात्र आद्यनृत्यांगणा पवळा यांची उपेक्षा केले जात आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे विशेष लक्ष घालून पत्र व्यवहार केला आहे ,तरी महाराष्ट्र शासन जाणीवपूर्वक स्मारकास निधी देण्यास टाळाटाळ करत आहे.

राज्य सरकार शासन आपल्या दारी योजना महाराष्ट्र भर राबवत आहे. सबका साथ! सबका विकास! तर शासन नामचंद पवळा यांच्या स्मारका बाबत दुपट्टी भूमिका किती काळ घेणार आहे. 12 ऑगस्ट रोजी नामचांद पवळा यांची 153 वी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या राष्ट्रीय स्मारकास निधी मंजूर करून द्यावा. आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा यांच्या जयंती निमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन:- 12 ऑगस्ट 2023 रोजी नामचंद पवळा भालेराव यांच्या 153 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी हिवरगाव पावसा ता.संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे कला सम्राज्ञी पवळा कला मंच संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. गरीब विद्यार्थी शिक्षणाचा प्रवाहातून बाहेर पडू नये यासाठी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शाळेचे साहित्य वाटप केले जाणार आहे. सामाजिक बांधिलकीतून सदर उपक्रम चार वर्षापासून संस्था राबवत आहे. अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपात नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या स्मृतीचे जतन करण्याचे कार्य संस्था करत आहे .

महाराष्ट्र शासनाने त्यांच्या राष्ट्रीय स्मारकास तातडीने निधी मंजूर करणे कामी ग्रामविकास विभागास आदेश देण्याची मागणी संस्थेच्या अध्यक्ष श्रीकांत तबाजी भालेराव व सचिव नितीनचंद्र चांगदेव भालेराव तसेच हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी केली आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed