Mumbai : Zunjar NewS

 

प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा आज महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार दिला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत या पुरस्कारची घोषणा केली होती. महाराष्ट्र भुषण पुरस्काराच्या धरतीवर या वर्षीपासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार हा पुरस्कार देण्यात आला. यंदापासून या पुरस्काराची सुरुवात झाली. हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार आहे. महिला उद्योजिका, मराठी उद्योजक आणि अन्य एकाला असे तीन पुरस्कार पण देण्यात येणार आहे. रतन टाटा यांचे सामाजिक आणि उद्योगातील मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याचा गौरव हा पुरस्कार देऊन करण्यात आला आहे.

 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्योपती रतन टाटा यांना हा पुरस्कार देण्यात आला. टाटा यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 25 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

टाटा समूहाचे अध्यक्ष

टाटा समूहाची कमान रतन टाटा यांच्याकडे आहे. विनयशीलता आणि मृदु स्वभाव यामुळे रतन टाटा यांचे वेगळेपण ठसते. यापूर्वी उद्योगातील चांगल्या कामगिरीसाठी 2000 मध्ये केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. फॉर्च्युन मासिकाने उद्योगातील 25 सर्वात प्रभावशाली उद्योजकांपैकी ते एक असल्याचा गौरव केला होता. टाईम मासिकाने 2008 मध्ये जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश केला होता. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने त्यांना मानद डॉक्टरेट दिली आहे.

1991 मध्ये झाले संचालक

टाटा मोठे उद्योजक, व्यावसायिक तर आहेतच पण एक संवेदनशील व्यक्ती ही आहेत. त्यांच्या अनेक धडाकेबाज निर्णयातून, कृतीतून त्यांनी ही गोष्ट सिद्ध केली आहे. रतन टाटा 1991 मध्ये टाटा ग्रुपचे संचालक झाले. 2012 पर्यंत ते या पदावर होते. ते परवानाधारक पायलट सुद्धा आहे.

टाटा ट्रस्टची मोठी कामगिरी

रतन टाटा यांचे नाव तर जगभरात त्यांच्या सामाजिक कार्य आणि देशप्रेमासाठी ओळखले जाते. आपल्या संपत्तीतील मोठ हिस्सा त्यांनी सामाजिक कार्यासाठी दान केला आहे. 1919 मध्ये टाटा ट्रस्टची (Tata Trust) स्थापना करण्यात आली. त्यावेळी 80 लाख रुपये दान करण्यात आले. टाटा ट्रस्ट ही भारतातील सर्वात जुनी सामाजिक संस्था आहे. या संस्थेमार्फत अनेक मोठ्या कामांसाठी सढळ हाताने दान देण्यात येते.

बैठकीत घेतला निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात महाराष्ट्र भूषण धरतीवर उद्योगात पुरस्कार देण्यासाठी बैठक झाली होती. या बैठकीत उद्योगरत्न पुरस्कार यंदापासून देण्याचा निर्णय झाला. हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार असेल. याशिवाय महिला तसेच मराठी उदयोजक आणि अन्य एका उद्योजकाला असे तीन पुरसकार देण्याचा निर्णय घेण्यात आला.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *