शिर्डी । झुंजार न्यूज

 

नगर जिल्ह्यात मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक उचल घोषित करत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर मात केल्याचे बोलले जात आहे. विखे यांच्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याने 3000 रुपये उचल घोषित केली आहे, तर  बाळासाहेब थोरात यांचा कारखाना 2800 रुपये उचल देणार आहे. त्यामुळे थोरातांच्या ‘संगमनेर’पेक्षा ‘प्रवरे’ची पहिली उचल ‘वरचढ’ ठरल्याचे बोले जात आहे. 

केंद्र सरकारने 3150 रुपये एफआरपी ठरवलेला आहे. यातून वाहतूक आणि तोडणी खर्च वजा जाता कारखान्यांना एफआरपी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावयाचा आहे. याच अनुषंगाने कारखान्यांनी वाहतूक आणि तोडणी खर्च गृहीत धरून साधारणपणे सरासरी 2700 च्या आसपास भाव घोषित केलेला आहे. मात्र, शेतकरी संघटनांनी कारखान्यांना ऊस गाळपाव्यतिरिक्त मोलॅसिस, बगॅस, वीजनिर्मिती यातून असलेल्या उत्पन्नाच्या विविध स्वरूपामुळे मिळणारा फायदा पाहता कारखान्याने किमान पहिली उचल 3100 रुपये द्यावी, अशी मागणी केलेली आहे.

नगर जिल्ह्याचा विचार करता शेतकरी संघटनांनी केलेल्या मागणीनुसार सहकारी साखर कारखान्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याने तीन हजार रुपये पहिली उचल घोषित केली आहे, तर खासगी साखर कारखान्यात श्रीगोंद्यातील गौरी शुगरने तीन हजार सहा रुपये हा सर्वाधिक दर पहिली उचल म्हणून घोषित केलेला आहे. त्यानंतर आता माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर सहकारी साखर कारखान्याने 2800 रुपये दर घोषित केला आहे. एकूणच नगर जिल्ह्याची परिस्थिती पाहता सहकारी साखर कारखान्यात आतापर्यंत घोषित झालेल्या पहिल्या दरामध्ये राधाकृष्ण विखे यांच्या प्रवरा कारखान्याने तीन हजार रुपये दर पहिली उचल म्हणून सर्वात सर्वाधिक दिलेला दिसून येत आहे.

 

जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यात अगस्ती 2500, ज्ञानेश्वर 2700, कुकडी 2600, विखे पाटील 3000, श्रीगोंदा 2500, केदारेश्वर 2700, वृद्धेश्वर 2725, संगमनेर 2800 या पद्धतीने पहिली उचल घोषित करण्यात आलेली आहे, तर खासगी सहकारी साखर कारखान्यात प्रसाद शुगरने 2700, गंगामाई 2750, श्री क्रांती शुगर 2700, ढसाळ अॅग्रो 2800 तर गौरी शुगरने सर्वाधिक तीन हजार सहा रुपये असा दर पहिली उचल म्हणून घोषित केला आहे.

नगर जिल्ह्याचा विचार करता एकूण 22 साखर कारखाने आहेत. यामध्ये 14 सहकारी साखर कारखाने, तर आठ खासगी साखर कारखाने आहेत. यातील 13 कारखान्यांनी आतापर्यंत आपली पहिली उचल घोषित केलेली आहे, तर नऊ कारखान्यांनी अद्यापही आपली पहिली उचल घोषित केलेली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख हीच मागणी आहे, की प्रत्येक कारखान्याने आपले अंतिम दर घोषित करावेत, जेणेकरून ऊस उत्पादक शेतकऱ्याला आपला ऊस कोणत्या कारखान्याला गाळपासाठी पाठवायचा याचा निर्णय घेता येईल. मात्र, नगर जिल्ह्याचा विचार करता अद्यापही 22 पैकी नऊ साखर कारखान्यांनी आपले दर घोषित केलेले नाहीत

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *