लोणी । झुंझार न्यूज
भारतीय चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे, लाखो रसिकांच्या गळ्यातील ताईत आणि ‘हीमॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रजी यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. .
प्रसारमाध्यमांकडे पाठविलेल्या आपल्या शोकसंदेशात ना. विखे पाटील यांनी धर्मेंद्र यांच्या समृद्ध कारकिर्दीचा आणि साध्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला आहे. ते म्हणाले की, धर्मेंद्रजी हे केवळ एक अभिनेते नव्हते, तर ते भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचे पान होते. आपल्या साधेपणाने आणि करिश्माई व्यक्तिमत्त्वानं त्यांनी दशकानुदशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
धर्मेंद्र यांच्या अभिनयाचा उल्लेख करताना ना. विखे पाटील म्हणाले की, “शोले’ चित्रपटातील वीरूच्या भूमिकेतील त्यांची धडाडी असो, ‘अनुपमा’मधील शांत आणि संयमी प्रेमी किंवा ‘धरमवीर’ मधील तडफदार भूमिका; प्रत्येक पात्र त्यांनी जिवंत केले. त्यांचे संवादफेक (Dialogue Delivery) आणि अभिनयातील सहजता ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली होती. अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व सिद्ध केले आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा एक अनमोल वारसा बनून राहिले
आपल्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी केलेली प्रचंड मेहनत, जिद्द आणि कलेप्रती असलेली निष्ठा ही नव्या पिढीतील कलाकारांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या निधनाने आपण एका अनुभवी आणि दिलदार अभिनेत्याला गमावले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशा शब्दांत ना. विखे पाटील यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
