यशोधन कार्यालयात जयंतीनिमित्त अभिवादन

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर बहुजनांच्या विकासासाठी लढा दिला. राज्यात उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असे विविध पदे भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केले. पक्षविरहित मित्रत्वाचे नाते जपण्याचा त्यांचा स्वभाव होता. आदर्श प्रशासक, लोकप्रतिनिधी असलेले स्व.गोपीनाथराव मुंडे हे कायम राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपणारे नेते होते असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात, बी.आर.चकोर, राजेंद्र चकोर, सुभाष सांगळे, ज्ञानेश्वर नाईक, संतोष नागरे, ह.भ.प.नवनाथ महाराज आंधळे, भाऊसाहेब गीते, सोमनाथ गोडसे, रमेश सानप, दत्तू कोकणे, तात्याराम कुटे, भारत शेलकर, तुषार वनवे, नितीन सांगळे, श्रीकांत सांगळे,गोरख घुगे आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे एक आदर्श लोकप्रतिनिधी, आदर्श प्रशासक आणि आदर्श मित्र होते. सर्वांसाठी आयुष्यभर झटणारा नेता असा त्यांचा आवर्जून उल्लेख होतो. अनेक दिवस एकत्र काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी पक्ष विरहित मैत्री त्यांनी कायम जपली.

स्वर्गीय विलासरावजी देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे यांची मैत्री ही महाराष्ट्रासाठी आनंदाचे पर्व होते. मित्रत्वाचे नाते जपण्याचा त्यांचा स्वभाव होता. कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन जाणारे गोपीनाथराव मुंडे यांनी उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री असे विविध पदे भूषवले. सर्व काळात शेतकरी आणि सर्वसामान्य करता मोठी कामे केली. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर खरे तर मोठे भविष्यकाळ त्यांना होता. मात्र त्यांच्या आपत्कालीन निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली त्यांचे योगदान कायम महाराष्ट्रातील जनतेच्या स्मरणात राहील असे ते म्हणाले.

तर माजी आमदार डॉ.तांबे म्हणाले की, राजकारणा पलीकडे गोपीनाथराव मुंडे आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांची मैत्री होती. विलासराव देशमुख यांचे कायम बाळासाहेब थोरात यांच्यावर बंधुवत प्रेम राहिले. राजकारण वेगळे आणि मैत्री वेगळी ही महाराष्ट्राची संस्कृती राहिली. बहुजनांचे नेतृत्व करताना त्यांच्या विकासासाठी गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर काम केले. यावेळी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांचे अभिनंदन

यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जोपासणारे देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून पुरोगामी विचार जपणारा लढवय्ये नेतृत्व म्हणजे शरद पवार साहेब असा उल्लेख करताना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीमध्ये शरदचंद्र पवार साहेब यांचे मोठे योगदान असल्याचे काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून महाराष्ट्राला पवार साहेबांच्या मार्गदर्शनाची गरज असून त्यांना उत्तम आरोग्य मिळो अशी प्रार्थना त्यांनी केली.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *