यशोधन कार्यालय येथे जयंतीनिमित्त अभिवादन
संगमनेर । झुंझार न्यूज
स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यावर भावाप्रमाणे प्रेम केले. लातूर नंतर संगमनेरच्या विकासाला प्राधान्य दिले. त्यांची व माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची जनतेप्रति बांधिलकी व कार्यशैली सारखी आहे. ते संगमनेरकरांच्या कायम हृदयात असून स्वर्गीय विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री होते असे गौरवउद्गार जयहिंद लोकचळवळचे संस्थापक मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांनी काढले आहे.
यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नवनाथ आरगडे, सुभाष सांगळे, सुधाकर जोशी,ॲड.त्रंबक गडाख, ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप जोशी, बाळासाहेब पवार, बाळासाहेब गायकवाड, भास्कर शर्माळे, जावेद शेख,सौ.अनिता दिघे,सौ.शितल उगलमुगले,अमित गुंजाळ, तात्याराम कुटे, ॲड.प्रमोद कडलग,रामनाथ कु-हे यांच्यासह विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा.आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुआयामी व्यक्तिमत्व होते. लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे वर त्यांचे विशेष प्रेम होते. ते मुख्यमंत्री असताना लातूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी थोरात साहेबांना दिली. दोघांची जनमानसाप्रती असलेली तळमळ आणि कार्यशैली सारखी आहे. विचार जुळत होते. शेतकरी व सर्वसामान्य माणूस केंद्र म्हणून त्यांनी कायम त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले.

संगमनेर तालुक्यावर त्यांनी विशेष प्रेम केले. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मागणीवरून संगमनेर शहरासाठी निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन योजना अगदी दोन मिनिटांमध्ये त्यांनी मंजूर करून दिली. काँग्रेस पक्ष अडचणीत असताना त्यांच्या नेतृत्वाची उणीव कायम भासत आहे.
विलासराव देशमुख यांचे रुबाबदार आणि प्रसन्न व्यक्तिमत्व, प्रभावी भाषण करण्याची पद्धत, सर्वसामान्य प्रति असली तळमळ, हजरजबाबीपणा, राजकारण विरहित सर्व नेत्यांशी असलेले त्यांचे प्रेमाचे संबंध होते. त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात दिलेले योगदान मोठे असून ते महाराष्ट्राचे अत्यंत लोकप्रिय व कर्तबगार मुख्यमंत्री होते असे त्यांनी म्हटले आहे.
तर नवनाथ आरगडे म्हणाले की, काँग्रेसचे विचार, परंपरा ही विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्रात रुजवण्यात मोठा वाटा उचलला त्यांचे योगदान महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहील तर सुभाष सांगळे म्हणाले की, विलासराव देशमुख यांचे नेतृत्व तरुणांसाठी कायम प्रेरणादायी आहे. त्यांची भाषणे आणि व्यक्तिमत्व हे तरुणांसाठी कायम स्फूर्तीदायी असल्याचे ते म्हणाले. यावेळी शहर व तालुका विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व.विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेसकडून शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत – मा.मंत्री बाळासाहेब थोरात
सध्या संपूर्ण देशामध्ये अर्थव्यवस्था ढासळली आहे. पेट्रोल – डिझेल सह इंधनाची भरमसाठ दरवाढ झाली आहे. महागाई वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी व सर्वसामान्य माणूस अस्वस्थ आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणे हि सरकारची जबाबदारी आहे. मात्र सध्याचे केंद्र व राज्य सरकार उदासीन आहे. याउलट स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेस आघाडी सरकारने कायम शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य व्यक्तींच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. अत्यंत हसतमुख व्यक्तिमत्व लाभलेले विलासरावजी हे महाराष्ट्राचे अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री होते असे गौरवउद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आता मा.प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
